अशोक सुतार
भारताला भाषांची प्राचीन परंपरा लाभली आहे. देशात विविध जाती-जमाती आहेत. त्यांच्या बोलीभाषाही वेगवेगळ्या आहेत. बोलीभाषा ही प्रत्येक समाजाची सांस्कृतिक ओळख आहे. ही सांस्कृतिक ओळख आज जागतिकीकरणाच्या युगात धूसर होत आहे की काय अशी परिस्थिती आहे. प्रत्येक समाजाने आपली बोलीभाषा समृद्ध करण्याचा व जतन करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जागतिकीकरणात इंग्लिश भाषेला मोठे महत्त्व आले असून लोक प्रादेशिक भाषेचा वापर करताना इंग्लिश भाषेतील शब्द वापरत आहेत. तर काही स्थानिक भाषा न्यूनगंडामुळे लोक बोलण्यास धजत नाहीत. बोलीभाषा लिखित असण्याचे प्रयत्न खूप कमी प्रमाणात होत आहे.
भाषेला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची असेल तर ती नेहमीच वापरात पाहिजे. भाषेचा प्रसार करायचा तर त्यासाठी उत्कृष्ट साहित्याची निर्मिती करण्यासाठी स्थानिक लेखक, साहित्यिकांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. महाराष्ट्रातील उदाहरण घेऊ. सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक लोक “मालवणी’ भाषा सर्रास बोलतात, पण ही भाषा लिखित स्वरूपात जोवर बाहेर सर्वत्र पोहोचत नाही, तोपर्यंत या भाषेचा गोडवा, स्थानिक संस्कृती इतरांना समजणार नाही. मुंबई, ठाणे, पालघर पट्ट्यात आगरी भाषा बोलली जाते. या भाषेची ओळख आज लोकांना होत आहे. प्रत्येक भाषेला सौंदर्य आहे, ताल आहे. परंतु भाषासंवर्धन झाले पाहिजे. जाणकार लोकांनी भाषा टिकविण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अनेक वृत्तपत्रांत काही बोलीभाषांतील सदरे वाचनीय आहेत. प्रादेशिक भाषेसाठी राज्य सरकार प्रयत्न करते, पण बोलीभाषेची जपणूक करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.
1961 च्या जनगणनेनुसार, भारतात 1,652 भाषा अस्तित्वात होत्या. द पीपल लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडियाने केलेल्या अभ्यासानुसार, 2010 मध्ये देशात 780 भाषा होत्या. यांपैकी 197 भाषांचे अस्तित्व धोक्यात आहे तर 42 भाषा नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. पूर्वांचलात अरुणाचल प्रदेश आणि आसाम, पश्चिम प्रांतात महाराष्ट्र आणि गुजरात, पूर्व भागात ओडिशा आणि बंगाल तर उत्तरेकडे राजस्थानमध्ये सर्वाधिक प्रादेशिक भाषा बोलल्या जातात. देशात वापरात असलेल्या 68 लिपी आहेत.
भारतात 35 भाषांमध्ये वृत्तपत्रे प्रकाशित होतात. हिंदी ही भारतात सर्वाधिक (40 टक्के) लोकांची बोलीभाषा आहे. त्यानंतर बंगाली (8 टक्के), तेलुगू (7.1 टक्के), मराठी (6.9 टक्के) आणि तमीळ (5.9 टक्के) या भाषा अनुक्रमे बोलल्या जातात. सरकारतर्फे चालवले जाणारे ऑल इंडिया रेडिओ अर्थात आकाशवाणी 120 भाषांमध्ये कार्यक्रम प्रसारित करते. भारताच्या संसदेत देशभरातल्या भाषांपैकी केवळ 4 टक्के भाषांचे प्रतिनिधित्व होते. (स्रोत : भारतीय जनगणना 2001 आणि 162, युनेस्को, पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया 2010) महाराष्ट्राच्या पश्चिम किनाऱ्यावर मुंबईपासून जवळ असलेल्या गावांमध्ये भारतात कालबाह्य ठरलेली पोर्तुगीज भाषा बोलली जाते. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर “करेन’ भाषा बोलली जाते. ऐतिहासिक वारसा लाभलेली ही भाषा प्रत्यक्षात म्यानमारची आहे. गुजरातमधल्या काही गावांमध्ये चक्क “जपानी’ भाषा बोलली जाते. भारतात तब्बल 125 विदेशी भाषा मातृभाषा म्हणून अस्तित्वात आहेत.
गुजरात राज्यातील विद्यापीठात डॉ. गणेश देवी नावाच्या इंग्रजी विषयाच्या प्राध्यापकांनी भाषा या विषयावर 17 वर्षे काम केले. त्यांनी भाषाशास्त्राचे औपचारिक शिक्षण घेतलेले नाही. मात्र, त्यांचा अभ्यास दांडगा आहे. त्यानंतर त्यांनी जवळच्या आदिवासी क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतला. आदिवासींच्या अकरा भाषांमध्ये ते नियतकालिके प्रसिद्ध करतात. भारतीय भाषांचे उद्गाते गणेश देवी पेशाने इंग्रजी प्राध्यापक, पण देवी यांना भारतीय भाषांबद्दल प्रेम आहे. या प्रेरणेतून त्यांनी भाषांचा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी तब्बल 780 भाषांचा अभ्यास केला. देवी यांच्या संशोधनामुळे असंख्य देशी भाषा अस्तित्वासाठी संघर्ष करत असल्याचे स्पष्ट झाले. नामशेष होत जाणाऱ्या या भाषांच्या दस्तावेज संवर्धनाचे काम त्यांनी हाती घेतले. हिमाचल प्रदेश राज्यात बोलल्या जाणाऱ्या 16 भाषा त्यांनी शोधून काढल्या. या भाषांमध्ये बर्फासाठी 200 प्रतिशब्द आहेत, हे त्यांनी शोधून काढले. राजस्थानात इंग्रजांनी गुन्हेगारी जमाती म्हणून बदनाम केलेल्या प्रजातींची मंडळी गुप्त स्वरूपाची भाषा बोलतात.
आठ वर्षांपूर्वी डॉ. देवी यांनी पीपल्स लिंग्विस्टिक सर्व्हे ऑफ इंडिया प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. देशातली माणसे जी प्रादेशिक भाषा बोलतात त्याचा अभ्यास करण्यासाठी हा प्रकल्प आहे. देवींनी दीड वर्षात भारत पिंजून काढला. भाषांचा सखोल अभ्यास करण्यासाठी ते अनेक राज्यांत फिरले. या कामात त्यांना त्यांच्या सहकाऱ्यांची साथ लाभली. अभ्यासक, शिक्षक, चळवळीतील कार्यकर्ते, ड्रायव्हर्स, वाटाडे अशा 3500 जणांची फौज त्यांनी उभारली. 1961 च्या जनगणनेतील 1,652 भाषांपैकी 2011 मध्ये डॉ. देवी यांच्या प्रकल्पामुळे भारतात केवळ 780 भाषाच शिल्लक राहिल्याचे स्पष्ट झाले.
संघटनेचे सर्वेक्षण आणि तपशीलवार अभ्यास मांडणाऱ्या 100 पुस्तकांपैकी 39 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. विशिष्ट भाषा बोलणाऱ्या व्यक्तींची कमी होणारी संख्या, स्थानिक भाषेत मिळणारे निकृष्ट दर्जाचे प्राथमिक शिक्षण तसेच जातीजमातींचे त्यांच्या मूळगावाहून होणारे स्थलांतर अशा विविध गोष्टींमुळे भाषा लयाला जात आहे. भाषा नष्ट होणे ही सांस्कृतिक हानी आहे.
भाषा लुप्त होण्याने संस्कृती, खरा इतिहास नामशेष होतो. जागतिकीकरणाच्या काळात आधुनिक झालेली शहरे भाषिक वैविध्य जपू शकतील का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. आपल्या अनेक भाषा काटेकोरपणे टिकल्या आहेत. म्हणूनच आपली लोकशाही भाषिक स्वरूपाची आहे. लोकशाही जिवंत राखण्यासाठी प्रादेशिक भाषा टिकणे अत्यावश्यक आहे. प्रादेशिक भाषा जपणे हे स्थानिक लोकांच्या हातात आहे. स्थानिक भाषेतील साहित्यनिर्मिती प्रादेशिक भाषांचा होणारा लय थांबवू शकते. म्हणून प्रादेशिक भाषेचे संवर्धन होणे महत्त्वाचे आहे.