आपत्तीवेळी ग्राहकांना अंधारात राहण्याची येणार वेळ
नगर – मान्सून सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने आपत्ती व्यवस्थापनाची तयारी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने संबंधित विभागाला दिले आहेत. परंतु महावितरण विभाग यापासून अलिप्त असल्याचे दिसत आहे. सध्याची परिस्थिती पाहता, लाईन खालची झाडे तशीच आहेत. भविष्यात पाऊस सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात झाडे लाईनवर पडल्याने तारा तुटतात. त्यामुळे लाईन पूर्णता: बंद होऊन ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
यापूर्वी प्री मान्सून मेन्टेनन्स महावितरण विभागाकडून केले जात होते. परंतु सध्याची परिस्थिती पाहता महावितरण विभागाकडून याकडे पूर्ण दुर्लक्ष झाले असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भविष्यात पाऊस सुरू झाल्यास मोठ्या प्रमाणात लाईन बंद राहून ग्राहकांना अंधारात राहण्याची वेळ येणार आहे.
नुकतीच जिल्हाधिकारी राहुल दिवेदी यांनी जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन समितीचा आढावा घेतला. यामध्ये आपत्ती व्यवस्थापन संबंधित प्रशासन यांना पावसाळ्यापूर्वी आपत्तीची पूर्वनियोजित तयारी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु महावितरण विभागकडून अद्याप कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. ही कामे 31 मे पर्यंत होणे अपेक्षित होते. परंतु लाईन मेंटेनन्ससाठी महावितरण विभागाकडून संबंधित अभियंत्यांना आगाऊ रक्कम पूर्वी दिली जात होती. त्यामधून लाईन खालची झाडे तोडण्यात येत होती. परंतु महावितरण विभागाने ही आगाऊ रक्कम देणे बंद केली आहे.
भविष्यात वादळी वाऱ्यासह पाऊस मोठ्या प्रमाणात झाल्यास वीजपुरवठा खंडित होऊन नागरिकांना तासनंतास अंधारात राहण्याची वेळ येणार आहे.तसेच आपत्ती व्यवस्थापनाच्या कर्तव्यामध्ये कसूर केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येईल, अशी समज सर्वाना देण्यात आली असून, कायद्यानुसार 1 वर्ष कारावास व दंडाची तरतुद करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले आहे.