विजय घोरपडे
नागठाण – जिल्ह्यातील 16 साखर कारखान्यांचा गळीत हंगाम येत्या काही दिवसांत सुरू होत असून सर्व 16 कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात ऊसनोंदीची आकडेवारी पाहता सव्वा लाख हेक्टरवरचा ऊस गाळपास उपलब्ध आहे. गाळप हंगामाच्या अनुषंगाने साखर आयुक्तालयाच्या नियोजनाप्रमाणे ऑक्टोबरमध्येच गाळप हंगाम सुरू करण्याची तयारी व आदेश होते. त्यानुसार काही मोजके कारखाने सुरूही रसर्व नियोजनावर पाणी फिरवले. आता नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात गाळप हंगाम सुरू होण्याची चिन्हे आहेत.
गेल्यावर्षीच्या गाळप हंगामातील ऊसाची एफआरपी पूर्ण करणाऱ्या साखर कारखान्यांनाच गाळप परवाना द्यावा, अशी मागणी ऊस उत्पादक व शेतकरी संघटनांतून होत आहे. मात्र, साखर आयुक्त कार्यालयाकडून धडाधड गाळप परवाने दिले जात आहेत. जिल्ह्यातील तीन कारखाने वगळता मागील वर्षी एक कोटी मेट्रीक टन ऊसाचं गाळप करुन सव्वा कोटी क्विंटल साखर उत्पादन झाले होते.
मिळालेल्या साखर उताऱ्याप्रमाणे होणारी एफआरपीची रक्कम काही कारखान्यांनी पूर्ण केली असून उर्वरित कारखान्यांनी 125 ते 140 रुपये अद्याप दिलेले नाहीत.
त्यात यावर्षी एफआरपी + 350 रूपयेची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आह. त्यावरून आता कारखाने व स्वाभिमानीत आंदोलन पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात ऊस उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये व वेळेत ऊस तोडणी व्हावी यासाठी यावर्षीची एफआरपी जाहीर करावी तसेच मागील एफआरपीची रक्कमही त्वरीत अदा करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. इकडे शासन स्तरावरून झालेल्या मंजुरीप्रमाणे कारखाने वेळेत सुरु करण्याचे आवाहन साखर आयुक्तांनी केले आहे. जिल्ह्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या कारखान्यांनी आपली जाहीर केलेली एफआरपी पूर्ण केली आहे. तर मागील देणेही काही कारखान्यांचे बाकी आहे.
मागील वर्षी जादा उसामुळे व तीन कारखाने बंद राहिल्याने शेतकऱ्यांची चांगलीच अडचण झाली होती. त्याचा कारखानदारांनी फायदा उठवत दोन तीन टप्प्यात एफआरपीची रक्कम दिली. मुळात कायद्याप्रमाणे एकरकमी एफआरपी 14 दिवसांत देणे बंधनकारक आहे. पण तो नियम कोणीही पाळला नाही. आता नव्याने सुरु होणाऱ्या हंगामाची तयारी कारखान्यांनी केली आहे. किसन वीर, खंडाळा व प्रतापगड हे तीन कारखाने यावेळी सुरु होणार आहेत. त्यापैकी खंडाळा कारखान्यास गाळप परवाना मिळाला आहे. त्यामुळे खंडाळा तालुक्यातील ऊस उत्पादकांना दिलासा मिळाला आहे.
आता वाई व जावळी तालुक्यातील किसन वीर व प्रतापगड कारखाना सुरु होणार असल्याने या दोन तालुक्यांतील उसाचा प्रश्न मिटणार आहे. पण एफआरपी पूर्ण न करताच काही कारखाने गाळप करणार आहेत. त्यांच्याविषयी साखर आयुक्त कार्यालयाची बोटचेपी भूमिका दिसत आहे. बहुतांशी साखर कारखाने हे लोकप्रतिनिधींचे आहेत. तसेच जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उसही उपलब्ध आहे. त्यामुळे वेळेत ऊस जाण्यासाठी कारखाने सुरु होणेही तितकेच महत्वाचे आहे.
ओन्ली रयत- अथनी…
कराडच्या रयत- अथणी या एकमेव साखर कारखान्याने या हंगामासाठीची 2925 एफआरपी जाहीर केली आहे. त्याचे अनुकरण करून उरलेले साखर कारखाने एफआरपीची कोंडी फोडतील का याकडे ऊस उत्पादक व विविध शेतकरी संघटना लक्ष ठेवून आहेत.