औरंगाबाद- ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (एआयएमआयएम) नेते इम्तियाज जलील यांनी महाराष्ट्र सरकारने औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर असे नामकरण करण्याच्या निर्णयावर सार्वमत घेण्याची मागणी केली आहे. ते म्हणाले की, असा निर्णय या शहरातील लोकच घेऊ शकतात, नाव बदलण्याचा निर्णय दिल्ली किंवा मुंबईत बसलेल्या कोणत्याही नेत्याला घेता येणार नाही.
केंद्र सरकारने गेल्या महिन्यात औरंगाबाद शहराचे ‘छत्रपती संभाजीनगर’ आणि उस्मानाबाद शहराचे ‘धाराशिव’ असे नामांतर करण्यास मान्यता दिली. औरंगाबादचे नाव मुघल सम्राट औरंगजेबावरून पडले आहे, तर उस्मानाबादचे नाव हैदराबाद संस्थानातील 20 व्या शतकातील शासकांनी ठेवले आहे. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार इम्तियाज जलील यांनी गुरुवारी रात्री शहराचे नामांतर करण्याच्या निर्णयाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयापासून ज्युबली पार्कपर्यंत मेणबत्ती मोर्चा काढला.
उपस्थितांना संबोधित करताना जलील म्हणाले, “भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना 2014-2019 या काळात सत्तेत होते. त्यावेळी त्यांनी शहराचे नाव बदलले नाही, परंतु त्यांचे सरकार जाणार होते, तेव्हा उद्धव ठाकरेंना ते स्वप्न आठवले. औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण हा शिवसेना-राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष -कॉंग्रेस सरकारचा शेवटचा मंत्रिमंडळ निर्णय होता.
सरकार कोसळण्याच्या बेतात आले असताना उद्धव ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर अशा प्रकारच्या निर्णयावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शिक्कामोर्तब केले. मुंबई, दिल्लीत बसलेला कोणताही नेता, मग ते कितीही मोठे असले तरी, देशातील कोणत्याही शहराचे नाव बदलण्याचा निर्णय घेऊ शकत नाहीत. हा निर्णय सार्वजनिक मतदानातून व्हायला हवा. यावर जनमत घेण्यात यावे,असे त्यांनी म्हटले आहे.