मुंबई : राज्यातील ठाकरे सरकारने नेत्यांच्या सुरक्षेबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपच्या दिग्गज नेत्याच्या सुरक्षेत मोठी कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा देखील समावेश आहे. या निर्णयानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांनी तातडीने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याशी संपर्क केला.
भाजप नेत्यांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सुरक्षेतही सरकारकडून कपात करण्यात आली आहे. तर माजी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या सुरक्षेत देखील कपात करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. यामुळे राजकारण तापण्याची चिन्हे होती. भाजप नेत्यांनी सरकारवर टीका करण्यासही सुरुवात केली होती. मात्र शरद पवारांनी केलेल्या फोनमुळे यावर फारशी चर्चा होणार नाही, असं दिसत आहे.
शरद पवारांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना फोन केला. तसेच माझी सुरक्षा कमी करा, असं पवारांनी देशमुख यांना सांगितले. ‘मी स्वत: सुरक्षा कमी करण्यास तयार आहे. मला देण्यात आलेल्या सुरक्षेचा आढावा घेऊन निर्णय घ्या,’ असं पवारांनी गृहमंत्र्यांना सांगितल्याचं कळतं.