आठवड्यातून एक दिवस पाणी बंद : सात दिवसांतच निर्णय बदलला
पिंपरी – पिंपरी-चिंचवडकरांना पुन्हा पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. आठ दिवसांतून एक दिवस विभागनिहाय पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असून पुढील आठवड्यात त्याची अंमलबजावणी होईल, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाचे सह शहर अभियंता मकरंद निकम यांनी दिली. दररोज पाणी पुरवठा सुरु केल्यानंतर केवळ सात दिवसांच्या आत आपलाच निर्णय मागे घेण्याची नामुष्की पाणी पुरवठा विभागावर ओढावली आहे.
मावळातील पवना धरणातून पिंपरी-चिंचवड शहर आणि मावळ परिसरातील भागाला पाणीपुरवठा केला जातो. रावेत बंधाऱ्यातून पाणी उपसा करुन महापालिकेतर्फे शहरवासियांना पाणी पुरवठा केला जातो. पवना धरणात आजमितिला 97.73 टक्के पाणी साठा आहे.
काही दिवस धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. त्यामुळे शहरात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. धरणात मुबलक पाणी साठा झाल्याचे सांगत महापालिकेने पाच महिन्यांपासून सुरु असलेली पाणीकपात रद्द करत बुधवारी (दि. 7) पासून शहरवासियांना दररोज पाणी पुरवठा सुरु केला. परंतु, पाण्याचे नियोजन कोलमडले. अनेक भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. पाण्याच्या असंख्य तक्रारी येत आहेत. नियमित पाणी पुरवठा सुरु करताना प्रशासनाने कोणतेही नियोजन केले नाही. त्यामुळे सात दिवसांतच आपलाच निर्णय बदलण्याची नामुष्की पाणीपुरवठा विभागावर ओढावली आहे.
पाणी कमी आणि मागणी जास्त झाली आहे. एकदम पाणी सोडल्यानंतर उंचावरील भागाला पाणी मिळत नाही. अत्यंत कमी दाबाने पाणी मिळते. त्यामुळे आठ दिवसांतून विभागनिहाय एक दिवस पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यानुसार नियोजन करण्यात येत असून पुढील आठवड्यात त्याची अंमलबजावणी होईल.
– मकरंद निकम, सह शहर अभियंता, पाणी पुरवठा विभाग.