मुंबई – राज्यातील सुमारे एसटी महामंडळाचे 105 डेपो सुरू झाले आहे. राज्यभरातील विविध आगारात सुमारे 19 हजार कर्मचारी कर्तव्यावर रूजू झाले. कर्मचाऱ्यांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे सोमवारी 250 आगारांपैकी 105 आगारातून वाहतूक सुरु झाली आहे. दरम्यान, रविवारी 734 बसेसद्वारे सुमारे 1703 फेऱ्यांच्या माध्यमातून महामंडळाच्या तिजोरीत 76 लाख 30 हजार रूपयांची भर पडली आहे.
एसटी महामंडळ राज्य सरकारमध्ये विलिनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असून गेल्या एक महिन्याहून अधिक काळ संप सुरु आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांनी दिलेल्या आवाहनाला कर्मचाऱ्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे दिसून येत आहे.
अनिल परब यांच्या आवाहनानंतर रविवारी अनेक कर्मचारी कामावर परतले. तर सोमवारी या संख्येत वाढ होऊन उपस्थितांची संख्या 19 हजारांपर्यंत पोहोचली. विशेष म्हणजे अनिल परब यांच्या आवाहनानंतर शनिवार, 3 डिसेंबर रोजी अवघी 49 आगारे सुरु होती. अवघ्या तीन दिवसानंतर 56 आगारांची भर पडून सोमवारी राज्यभरातील 105 आगारे सुरु झाली आहेत. तसेच, जे कर्मचारी कामावर रूजू होत आहेत, त्यांना पोलीस संरक्षणही दिले जात आहे.
सोमवारी 245 कर्मचाऱ्यांचे निलंबन
सोमवारी 6 डिसेंबर रोजी संपात सहभागी असलेल्या 245 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले तर 10 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे. सोमवारी (6 डिसेंबर) आलेल्या आकडेवारीनुसार कालपर्यंत 9625 कर्मचाऱ्यांचे निलंबन करण्यात आले. तर 1990 कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्यात आली आहे.