सातारा – आरोग्य विभागातील रिक्त पदांसाठी मार्च 2019 मध्ये भरती प्रक्रिया होणार होती. मात्र, करोना संकटामुळे या प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली होती. करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने दि. 8 सप्टेंबर ते 31 ऑक्टोबर या कालावधीत भरतीची प्रक्रिया राबविण्याचे आदेश राज्य सरकारने दिले होते. मात्र, पुन्हा एकदा ही भरती अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले असून या निर्णयाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
पाच संवर्गासाठी आरोग्य विभागाच्या विविध पदांसाठी मार्च 2019 मध्ये भरती होणार होती. ही प्रक्रिया राबविण्यासाठी विभागीय स्तरावरुन एजन्सी नेमली होती. करोना प्रादुर्भावाने भरती प्रक्रिया रखडली होती. त्यानंतर गेल्या दोन वर्षात नेमण्यात आलेल्या एजन्सी व इतर सर्व प्रक्रियेला स्थगिती देऊन नव्याने एजन्सी नेमण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत.
त्यानुसार आरोग्य विभागातील गट क मधील आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषध निर्माता, आरोग्य पर्यवेक्षक आदी पदांसाठीच्या भरती प्रक्रियेसाठी सुधारित वेळापत्रक जाहीर केले होते. यामध्ये 15 व 16 ऑक्टोबरला परीक्षेचे आयोजन (ऑनलाइन पध्दतीने) करुन अंतिम यादी प्रसिध्द करुन नियुक्तीचे आदेश देण्याचे जाहीर केले होते. परंतु, ही परीक्षा पुन्हा पुढे ढकलण्यात आल्याने उमेदवारांचे भवितव्य अंधारमय झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील गट क मधील विविध पदांसाठी होणारी भरती प्रक्रिया 2019 मधील आहे. त्यावेळी परीक्षेला बसणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज स्वीकृती करुन घेण्यात आली होती. त्यामुळे आता नव्याने अर्ज भरुन न घेता त्या वेळचे उमेदवार गृहीत धरुन भरती होणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. हा निर्णय विद्यार्थ्यांच्या हिताचा असला तरी तीन वर्षे ही भरती प्रक्रिया रखडल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.