मुंबई – राज्यसरकार येत्या तीन महिन्यांमध्ये राज्यातील शासकीय रुग्णालयांमधील डॉक्टरांच्या ९१३ रिक्त पदांपैकी ५७४ पदांची भरती करणार आहे. याबाबतची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानसभेमध्ये बोलताना दिली.
विधानसभेमध्ये प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान याबाबत बोलताना त्यांनी, ‘नियुक्ती करण्यात येणाऱ्या ५७४ पदांपैकी ३०४ पदांची नव्याने भरती करण्यात येणार असून उर्वरित २७० पदे बढतीद्वारे भरण्यात येतील.’ असे देखील स्पष्ट केले.
भरतीच्या विकेंद्रीकरणानंतरही ग्रामीण भागात काम करण्यास डॉक्टर उदासीन
यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सरकारी दवाखान्यांमधील डॉक्टर भरतीच्या विकेंद्रीकरणानंतरही ग्रामीण भागात काम करण्यास उदासीनता दाखवत असल्याची खंत बोलून दाखवली. सध्याच्या भरती प्रक्रियेनुसार जिल्हाधिकारी, ज़िल्हापरिषद अध्यक्ष, व जिल्हा शैल्य चिकिस्तक यांच्याकडे डॉक्टर भरतीचे अधिकार असून सरकारी रुग्णालयांमध्ये काम करणाऱ्या डॉक्टरांना मासिक वेतन म्हणून ६०,००० एवढं वेतन देण्यात येतं.
डॉक्टरांच्या नेमणुकीसाठी फडणवीसांचा सल्ला
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी ग्रामीण भागातील डॉक्टरांची कमतरता भरून काढण्यासाठी, ‘वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांकडून प्रवेशावेळीच आपण सुरुवातीची काही वर्ष सरकारी दवाखान्यांमध्ये काम करू याप्रकारची लिखित हमी घ्यावी’ अशी सूचना केली