“वसुली पंटर’च्या वरिष्ठाचे नसते उद्योग
भावाकडून दबावतंत्राचा वापर
पुणे – येरवडा पोलीस ठाण्यात मागील 20 वर्षे ठाण मांडणाऱ्या “वसुली पंटरची’ पोलखोल केल्यावर पोलीस दलात खळबळ माजली आहे; तर हॉटेल व्यावसायिक आणि व्यापाऱ्यांनी आता तरी आपली सुटका होईल, असा निश्वास टाकला आहे.
संबंधित वसुली पंटरला “पळता भुई थोडी’ झाली आहे. तर, व्यावसायिक त्याच्याकडून होत असलेल्या त्रासाबद्दल आता उघडपणे बोलू लागले आहेत. दुसरीकडे वसुली पंटरमुळे अडचणीत आलेल्या वरिष्ठाने चौकशीतून वाचण्यासाठी नसते उद्योग सुरू केले आहेत. आपल्या उद्योगपती भावाला मध्यस्थीकरत कारवाईतून सुटका करण्यासाठी नवनवे फंडे आजमावू पहात आहे. यासाठी साम, दाम आणि धनादेशाचे आमिष दाखवले जात आहे. पोलखोल करणाऱ्यांनाच जाळ्यात अडकवून कारवाईतून सुटका करून घेण्याचे नियोजन केले आहे.
येरवडा पोलीस ठाण्यातील वसुली पंटरच्या कारनाम्याने वाभाडे निघाल्यावर परिसरात मागील दोन दिवस हाच विषय चर्चीला जात होता; तर त्याने नुकत्याच हॉटेल सुरू केलेल्या चालकाला दमदाटी करत “हॉटेल माझ्या परवानगीशिवाय चालूच कसे केले’ अशी ऑडिओ क्लिपही व्हायरल होत आहे. वसुली पंटरच्या संपर्कातील इतर पोलीस ठाण्यातील वसुली पंटरांचेही धाबे दणाणले आहेत. संबंधित वसुली पंटर पोलीस आयुक्तालयातील बड्या अधिकाऱ्यांच्या रडारवर आला आहे. त्याच्यावर कारवाई होणार असल्याचे समजताच तो भूमिगत झाला आहे. कुठल्याही पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्याने चुकीचे काम केल्यास त्यास नैतीक जबाबदारी म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्यांवरही कारवाई केली जाते. कर्मचाऱ्यांच्या नसत्या उद्योगांचे परिणाम नुकतेच दोन पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना भोगावे लागले. तोच नियम वसुली पंटरच्या वरिष्ठांनाही लागू होणार आहे. यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याने चौकशी आणि कारवाईच्या फेऱ्यातून सुटण्यासाठी स्वत:च्या भावाला पुढे केले आहे.
वृत्त प्रसिद्ध न होण्यासाठी साम, दामाचे आमिष संबंधित भाऊ ओळखीच्या माध्यमातून आपल्या वरिष्ठ भावाची प्रतिमा उजळ करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी तो हरतऱ्हेने भावाविरुद्ध कोणतेही वृत्त प्रसिद्ध होऊ नये यासाठी मध्यस्थामार्फत प्रयत्न करत आहे. इतकेच नव्हे तर साम आणि दामाचेही आमिष दाखवून प्रतिसाद न मिळाल्याने तो धनादेशाचे जाळे पसरवत आहे. उद्योगाची जाहिरात प्रसिद्ध करायची असल्याचे भासवत धनादेश कोणत्या नावाने पाठवायचा असे संदेश प्रतिनिधींपर्यंत पोहोचवले जात आहेत. परंतु, या जाळ्यातही कोणी अडकत नसल्याने संबंधित वरिष्ठावर कारवाई अटळ असल्याचे मानले जात आहे.