नगर (रवींद्र कदम) –आरबीआयच्या सूचनेनुसार केंद्र व राज्य शासनाने शासकीय, निमशासकीय बॅंक, फायनान्स कंपन्यांच्या सर्व प्रकारच्या कर्जांचे हप्ते तूर्तास स्थगित केले आहेत. मात्र, नगर जिल्ह्यात काही फायनान्स कंपन्यांकडून लॉकडाऊन काळातही वसुलीसाठी तगादा लावला जात आहे. त्यात अनेकांचे चेक बाऊंस करण्यात आले असल्याचा प्रकार नगरमध्ये उघडकीस आला आहे.
जिल्ह्यातील अनेक शेतकरी, शेतमजूर, वीटभट्टी कामगार, गवंडी, मेकॅनिक, फिटर, कंपनी कामगार, सलून दुकानदार अशा अनेक सर्वसामान्य नागरिकांनी फायनान्स कंपन्यांकडून विविध वस्तू खरेदीसाठी कर्ज घेतले आहे. सध्या लॉकडाऊनमुळे कुठलाही कामधंदा नसल्यामुळे तूर्तास आर्थिक अडचणीमुळे तीन महिन्यांसाठी बॅंका व फायनान्स कंपन्यांकडून कुठलीही वसुली करु नये, असे प्रशासकीय आदेश देण्यात आले आहेत.
सद्या सर्वत्रच करोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन केले आहे. त्यामुळे छोटे-मोठे उद्योग बंद पडले असून, आर्थिक चक्रही फिरेनासे झाले आहेत. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तरीही लॉकडाऊनमध्येही नगर शहरातील फायनान्स कंपन्यांच्या वसुली अधिकाऱ्यांमार्फत सर्वसामान्य ग्राहकांकडे वसुलीचा तगादा लावण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
श्रीराम सिटी फायनान्सकडून दुचाकीसाठी कर्ज घेतले होते. आत्तापर्यंतचे सर्व हप्ते भरले आहेत. शेवटचे दोन हप्ते बाकी असून, लॉकडाऊनमुळे एप्रिलमधील हप्त्याच्या धनादेश पाठवू नका, अशी विनंती फायनान्सच्या प्रतिनिधिला केली होती. मात्र त्यांनी धनादेश बॅंकेत जमा केला. तो बाऊंस झाल्याने कंपनीकडून वारंवार हप्ता भरण्यासाठी प्रतिनिधींचे दूरध्वनी येत आहेत. त्यामुळे याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे न्याय मागणार आहे.
राम कदम, ग्राहक फायनान्स कंपनी
ज्या ग्राहकांना हप्ते भरणे शक्य आहे, त्यांना आम्ही फोन करून ऑनलाईन, तसेच डिजिटल पेमेंट भरण्याबाबत मार्गदर्शन करत आहोत. तसेच ज्या ग्राहकांनी सवलत घेतली आहे, त्यांच्याकडे वसुलीसाठी तगादा लावला जात नाही.
दीपक जाटव, व्यवस्थापक, श्रीराम सिटी फायनान्स