भाग 2
अमर मोकाशी
सातारा, दि. 3 – किल्ले वासोटा पाहण्यासाठी दर आठवड्याला हजारो पर्यटक गर्दी करतात. वासोटा किल्ला व्याघ्र प्रकल्प आरक्षित क्षेत्रात आहे. किल्ले वासोट्यावर येणाऱ्या पर्यटकांची सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभाग गळचेपी करत असल्याचा आरोप होत आहे. पर्यटकांकडून “एंट्री फी’ घेतली जातेच, शिवार विविध कारणांनी पर्यटकांची आर्थिक लूट सुरू आहे. पैसे घ्या, पण त्या प्रमाणात सुविधा पुरावा, अशी मागणी होत आहे. त्याकडे व्याघ्र प्रकल्प विभाग जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाकडून वसुली जोमात सुरू असल्याची चर्चा आहे. पैसे द्यायला कोणाचाही नकार नाही; पण, पर्यटकांना थोड्या सुविधा द्या, अशी मागणी होत आहे. एका बोटीतून जास्तीत जास्त 15 पर्यटक तीन-चार हजार रुपये खर्च करून किल्ल्यावर पोहोचतात. वास्तविक बोटिंग आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभाग यांचा काहीही संबंध नाही, तरीही एका बोटीत 15 पर्यटक, असा दंडक आहे. एका ग्रुपमध्ये 15 पेक्षा जास्त पर्यटक असतील, तर उर्वरित लोकांसाठी दुसरी बोट करावी लागते. त्यामुळे पर्यटकांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.
करोनामुळे सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाने हा दंडक केल्याचे सांगण्यात येते. या नियमाला किल्ल्याच्या पायथ्याला या विभागाकडूनच हरताळ फसला जातो. पर्यटकांचे फॉर्म भरणे, नोंदणी शुल्क भरून घेणे आणि सामानाची तपासणी करण्यासाठी झुंबड उडते. बोटीत 15 पर्यटकांची मर्यादा आणि किल्ल्यावर एकाच वेळी हजारो पर्यटकांची गर्दी, असा अनुभव येतो.
बोटीतून एक-दीड तासाचा प्रवास करून किल्ल्याच्या पायथ्याला पोहोचल्यानंतर, आता किल्ला सर करू, अशी आशा बाळगणाऱ्या पर्यटकांच्या पदरी निराशा यायला सुरुवात होते. किल्ल्याच्या प्रवेशद्वारावरच सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाकडून अडवणूक सुरू होते. बोटीच्या क्रमांकानुसार पर्यटकांच्या ग्रुपचे बुकिंग करणे, पैसे भरून घेणे, जेवणाचे डबे, पाणी बाटली आदी सामानाची तपासणी करणे यासाठी झुंबड उडते. यात अर्धा ते एक तास जातो. या विभागाकडून होणाऱ्या आर्थिक लुटीची चीड येते.
“सह्याद्री व्याघ्र प्रकल्प राखीव – वासोटा ट्रेक’ या नावाने दिल्या जाणाऱ्या पावतीनुसार पर्यटकांकडून प्रत्येकी 30 रुपये आकारले जातात. कॅमेरा असेल तर 50 रुपये आकारले जातात. विशेष म्हणजे वाघाच्या नावाखाली पर्यटकांच्या ग्रुपकडून 100 रुपये, बोट पार्किंगचे 150 रुपये आकारले जातात. त्यामुळे किल्ल्यावर वाघ पाहायला मिळणार का, असा प्रश्न पडतो. पर्यटकांना क्वचितच गाइडची आवश्यकता असते, तरीही 200 रुपये घेतले जातात. बोट शिवसागर जलाशयात लावलेली असते. किल्ला परिसराशी त्याचा संबंध नसला, तरीही पार्किंगचे 150 रुपये उकळले जातात.
किल्ल्यावर नेण्यात येणाऱ्या पाण्याच्या बाटल्या मोकळ्या आणणे बंधनकारक आहे. कागद, रॅपर आदी टाकाऊ वस्तू किल्ल्यावर टाकू नयेत, त्या माघारी आणाव्यात यासाठी 500 रुपये डिपॉझिट घेतले जाते. हा पर्याय योग्यच आहे; परंतु सगळी जबाबदारी पर्यटकांवर ढकलून सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाने केवळ पैसे उकळण्यासाठी वासोट्याचा मालकी हक्क घेतला आहे का, असा संतप्त सवाल विचारला जात आहे.
सगळे सोपस्कार पूर्ण करून पर्यटक किल्ल्यावर चढाई सुरू करतात. पर्यटकांच्या वर्दळीमुळे किल्ल्याच्या वाटेतील दगडधोंडे जणू काही पॉलिश केल्यासारखे गुळगुळीत झाल्याने, त्यावरून अनेक जण घसरून पडतात. त्यात काही जण जायबंदी होतात. जेथे गरज आहे, तेथे पायऱ्या नाहीत. नको त्या तीन-चार ठिकाणी पायऱ्या बांधण्यात आल्याने किल्ला चढणाऱ्यांची दमछाक होते. बोजा घेऊन किल्ला चढणे कठीण असल्याने पर्यटक पाण्याच्या दोन-तीन बाटल्या सोबत घेतो. हे पाणी पुरत नाही आणि किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोयही नाही.
रस्त्यात विसाव्याची सुविधा नाही. वरून येणारे आणि खालून वर चढणाऱ्या पर्यटकांमुळे रस्त्यात गर्दी होते. दमलेले पर्यटक रस्त्यातील दगड अथवा लाकडाचा आसरा घेऊन बसतात. त्यामुळे इतरांची गैरसोय होते. किल्ल्याची चढण लागली की, निमुळती, वाकडीतिकडी, घसरडी एकेरी पायवाट महिला व वृद्धांचा थरकाप उडवते. मुरूम व दगडधोंड्यांमुळे अनेक जण घसरून पडतात. एखादा पर्यटक खोल दरीत कोसळून जीवितहानी होण्याची शक्यताही नाकारता येत नाही.
किल्ल्यावरील चढाई कठीण असल्याचा अंदाज आल्याने अनेक जण माघार घेतात. स्वतःच्या नशिबाला दोष देत पायथ्याकडे मार्गक्रमण करतात. काही जण सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाच्या नावाने शिमगा करतात. भर उन्हात किल्ला चढल्यावर प्रत्येक जण मिळेल ती जागा पकडून बसून गटागटा पाणी पितो. बोटवाल्याने दिलेला डबा खातो. तेथेही विश्रांतीची पुरेशी सोय नाही. थकलेला पर्यटक किल्ल्यावरील ऐतिहासिक ठिकाणे पाहणे टाळतो. आता खाली उतरायचे कसे, याची चिंता सतावू लागते. किल्ल्यावरील शिव मंदिर पाहून व भगव्या ध्वजाखाली फोटो काढून बरेचसे पर्यटक किल्ला उतरायला सुरुवात करतात. किल्ल्याच्या प्रत्येक बाजूला खोल दरी, घनदाट जंगल असूनही संरक्षक कठडे नाहीत. तीव्र उतार आणि घसरडी पायवाट यामुळे जीव मुठीत घेऊन किल्ला उतरावा लागतो. अननुभवी ट्रेकर्सही फसतात, पडून जायबंदी होतात. मग, इतरांचे, वृद्ध व महिलांचे काय हाल होत असतील, याची कल्पनाच केलेली बरी. किल्ला उतरल्यानंतरही पाणी, चहा, नाश्त्याची सोय नसल्याने पर्यटकांचे हाल होतात. पैसे मोजल्यानंतरही सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाकडून कोणत्याही सुविधा का दिल्या जात नाहीत, असा प्रश्न पर्यटक व बोट व्यवसायिक विचारत आहेत.
कर्मचारी जपतात माणुसकी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विभागाच्या मनमानी कारभारामुळे वासोटा पर्यटन कठीण होत असताना, पर्यटक वन कर्मचाऱ्यांचे आभार मानतात. किल्ल्यावरून पर्यटक वेळेत खाली उतरावेत म्हणून दोन-तीन कर्मचारी दुपारी तीनच्या सुमारास वर येऊन सूचना देतात. किल्ला उतरताना अशा काही जागा आहेत की, काही पर्यटक तेथून खाली उतरू शकत नाहीत. तेथे हे कर्मचारी थकलेल्या, घाबरलेल्या पर्यटकांना आधार देतात.