अमरावती – राज्यात करोनाची परिस्थिती तसेच पावसाला सुरुवात झालेली असून देखील पणन विभागाने राज्यात विक्रमी सुमारे 219.49 लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. अमरावती जिल्ह्यातही खरेदी केंद्रांची संख्या वाढविणे, खरेदीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करून देणे आदी विविध उपाययोजनांतून मोठी कापूस खरेदी झाली आहे, अशी माहिती डॉ. यशोमती ठाकूर यांनी दिली.
यशोमती ठाकूर म्हणाल, गेल्या 10 वर्षात झाली नाही अशी विक्रमी कापूस खरेदी यंदाच्या वर्षी करण्यात आली आहे. या खरेदीचे एकूण मुल्य 11,776.89 कोटी रुपये असून आतापर्यात 11,029.47 कोटी इतकी रक्कम शेतकऱ्यांना अदा करण्यात आली आहे. तसेच सीसीआयने 30 सप्टेंबर 2020 पर्यंत एफएक्यू दर्जाचा कापूस खरेदी करणार असल्याचे घोषित केले आहे.
राज्यात सीसीआय व राज्य कापूस पणन महासंघाने करोनाच्या प्रादूर्भावापूर्वी अनुक्रमे 91.90 व 54.03 लाख क्विंटल अशी एकूण 145.93 क्विंटल कापूस खरेदी केली. तसेच कोविड-19च्या प्रादूर्भावामुळे कापसाचे बाजारातील दर हमीपेक्षा कमी असल्याने शेतकऱ्यांचा कल, शासकीय खरेदी केंद्रावर विकण्याचा होता. त्यानुसार शासकीय खरेदी नियोजन करून सीसीआय व कापूस पणन महासंघाने आतापर्यंत अनुक्रमे 35.70 व 36.75 लाख याप्रमाणे 72.45 लाख क्विंटल कापूस खरेदी केला आहे.
राज्यातील शासकीय व खासगी अशी एकूण खरेदी 418.8 लाख क्विंटल झाली असून वास्तविक पाहता 410 लाख क्विंटल कापूस खरेदी अपेक्षित होती. एकूण 8 लाख 64 हजार 72 शेतकऱ्यांकडून कापूस खरेदी करण्यात आला.