नवी दिल्ली : देशातील अनेक राज्यांत उन्हाच्या पाऱ्याने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत. उन्हामूळे नागरिक एप्रिल महिन्यातच त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर भारतीय हवामानशास्त्र विभागाने देशातील आठ राज्यांना अलर्ट जारी केला आहे.
भारतीय हवामानशास्त्र विभागाने, देशातील आंध्र प्रदेशसह आठ राज्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उन्हामुळे अनेक राज्यांत परीक्षा काळातही शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत, तर काही राज्यांत शाळांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.
पुढील दोन दिवस कमाल तापमानात लक्षणीय वाढ होण्याची शक्यता नसल्याचे सांगण्यात आले असले तरी आंध्रशिवाय उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड, सिक्कीम, ओडीशा व उत्तर प्रदेश अशा आठ राज्यांत उष्णतेच्या लाटेमुळे दक्षतेचा इशारा देण्यात आला.
आज सकाळी प्रसिद्ध करण्यात आलेल्या माहितीनुसार उत्तर प्रदेश आणि बंगाल या राज्यांतील गंगेच्या किनाऱ्यावरील भागांत उष्णता वाढण्याची शक्यता आहे. या पट्ट्यात बंगालमध्ये गेले आठ, तर बिहारमध्ये गेले पाच दिवस उष्णता कायम आहे. ईशान्य, उत्तर, पूर्व आणि मध्य या विभागांतील अनेक भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत वाढ झाली.