पुणे – ग्रामीण भागात दुष्काळाची तीव्रता वाढत असून, प्रशासनाच्या वतीने दुष्काळी उपाययोजना करण्यात येत आहेत. जनावरांच्या चाऱ्यासाठी बारामती तालुक्यात तीन चारा छावण्यांना मंगळवारी मान्यता देण्यात आला आली आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी भानुदास गायकवाड यांनी दिली.
गेल्यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने पाणी आणि चाराटंचाई निर्माण झाली आहे. जिल्ह्यात सध्यस्थितीत 202 टॅंकरने पाणीपुरवठा केला जात असून, मोठी जनावरे आठ लाख 54 हजार आहेत, त्यांना प्रति महिना 1 लाख 72 हजार 80 मेट्रिक टन चारा लागतो. ते उपलब्ध करून घेणे हे प्रशासनापुढे मोठे आव्हान होते. आवश्यक चारा उपलब्ध होण्यासाठी राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत वैरण विकास कार्यक्रम आणि गाळपेर क्षेत्रात चारा पिके घेण्यात आली. त्यासाठी 242 मेट्रिक टन चारा बियाणे वाटप करण्यात आले होते. त्यातून 7 लाख 86 हजार मेट्रिक टन चारा उपलब्ध झाला आहे. ज्या भागात चारा छावणी सुरू करण्याची गरज आहे, त्याठिकाणी मान्यता दिली जाईल, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले होते. त्यानुसार बारामती तालुक्यात तीन छावण्यांना मंगळवारी मान्यता देण्यात आली आहे. बारामती, शिरूर व खेड तालुक्यांत चारा छावणी सुरू करण्याची गरज भासणार आहे. अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.