आडत्यांनी ठेवल्या अटी आणि शर्थी; 750 कोटी रुपयांचा प्रकल्प
पुणे – पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केटयार्डाच्या सुमारे 750 कोटी रुपयांच्या पुनर्विकास प्रकल्पास आडत्यांनी सहमती दाखविली. त्यासाठी त्यांनी त्यांच्या काही अटी आणि शर्थी ठेवल्या आहेत. त्यास अनुसरून काम केल्यास अंतिम मान्यता देणार असल्याचे सांगितले. या प्रकल्पावर येत्या बुधवारी पुन्हा बैठक होणार आहे.
बाजार समितीच्या गुलटेकडी येथील भाजीपाला, फळे विभागाच्या इमारतींचे बाजार समिती प्रशासनाने आजवर दोन-तीन वेळा “स्ट्रक्चरल ऑडिट’ केले असून त्यातही इमारती धोकादायक असल्याचा अहवाल समोर आला आहे. काही भाग कोसळू शकण्याची शक्यताही वर्तविली आहे. त्यामुळे तत्कालिन प्रशासक मंडळाने भाजीपाला, फळे विभागाच्या पुनर्विकास प्रकल्प हाती घेतला होता. सुमारे 750 कोटी रुपयांच्या हा प्रकल्प आहे. मंडळाने आराखडा तयार करून आडत्यांची बैठक घेतली होती. त्यावेळी आडत्यांनी हा प्रकल्प हाणून पाडला होता. आता बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख हे जुन्या प्रकल्पात दुरूस्ती आणि एक नवीन प्रकल्प अशा स्वरूपात आडत्यांसमोर प्रस्ताव ठेवणार आहेत. त्यावर बुधवारी होणाऱ्या बैठकीत चर्चा होईल.
याबाबत श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ म्हणाले, “पुनर्विकास करण्यासाठी समितीने कळविले असून आम्ही सहमती दर्शविली आहे. मात्र, त्यासाठी काही अटी व शर्थी ठेवल्या आहेत.
बाजार इमारतीचा काही भाग जीर्ण झाला असून काही भाग कोसळण्याची शक्यताही स्ट्रक्चरल ऑडिटच्या अहवालात वर्तविली आहे. त्यामुळे आडत्यांना विचारात घेऊन पुनर्विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. याबाबत बुधवारी बैठक होणार आहे.
– बी.जे.देशमुख, प्रशासक, बाजार समिती, पुणे.