नवी दिल्ली – देशात करोना संसर्गाला सुरुवात झाल्यापासून शाळा आणि महाविद्यालय बंद करण्यात आली होती. अनेक महिने शाळा आणि महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले होते. तर अनेक ठिकाणी परीक्षाही ऑनलाईन घेण्यात आल्या आहेत. मात्र पद्दुचेरी येथे चित्र वेगळ आहे.
इयत्ता १ ली ते इयत्ता ११ वी अशा सर्वच विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षी उत्तीर्ण करण्याच्या प्रस्तावाला पुद्दुचेरीच्या राज्यपालांनी मान्यता दिली आहे. पुद्दुचेरीच्या राज्यपाल तमिलसई सुंदरराजन यांनी पुद्दुचेरी प्रशासनाकडून १ ली ते ९ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करण्यासंदर्भात प्रस्ताव पाठवला होता. त्यावर आता राज्यपालांच्या मान्यतेची मोहोर उमटवली आहे. येथील विद्यार्थ्यांसाठी हा सुखद धक्का ठरला आहे.
यापूर्वी तामिळनाडूमध्ये अशाच प्रकारचा निर्णय घेण्यात आला होता. इयत्ता ९वी, १०वी आणि ११वीच्या विद्यार्थ्यांना तिमाही आणि सहामाही परीक्षेच्या आधारे पास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यावर टीका झाली होती. मात्र पद्दुचेरी येथे विद्यार्थ्यांना डायरेक्ट पास करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान १ ली ते ९ वीच्या विद्यार्थ्यांना शाळेच्या तासिकांना ३१ मार्चपर्यंत हजेरी लावावी लागणार आहे. पाच दिवसांचा आठवडा असणार असून शनिवारी आणि रविवारी सुट्टी असणार आहे. तर ३१ एप्रिलपासून विद्यार्थ्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरू होणार आहे.