पुणे – पती-पत्नीने परस्पर संमतीने घटस्फोटासाठी दाखल केलेला दावा कौटुंबिक न्यायालयाने मंजुर केला. दोघेही 2008 पासून वेगळे राहात आहेत. ते पुन्हा एकत्र नांदु शकणार नाहीत, असा निष्कर्ष काढत अर्ज केल्यानंतर दावा प्रलंबित ठेवण्यात येणारा सहा महिन्यांचा कालावधी वगळून न्यायालयाने हा निर्णय दिला.
माधव आणि माधवी (नावे बदलली आहेत) अशी त्या दोघांची नावे आहेत. दोघांचा विवाह मार्च 2007 मध्ये हिंदु पद्धतीने झाला. एक महिन्याचा संसार झाल्यानंतर दोघांचे पटेनासे झाले. त्यामुळे ती माहेरी राहु लागली. दोघांना अपत्यही नाही. त्यानंतर त्याने 2012 मध्ये कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटासाठी दावा दाखल केला. त्यामध्ये तात्पुरता पोटगीचा निर्णय झाला. मात्र, त्याने पोटगी भरलीच नाही. त्यामुळे 2015 मध्ये तो दावा न्यायालयाने रद्द केला. त्यानंतर दोघांनी एकत्र येत परस्पर संमतीने घटस्फोटासाठी एप्रिल 2019 मध्ये न्यायाधीश सुभाष काफरे यांच्या न्यायालयात दावा दाखल केला. त्यानंतर समुपदेशाकडे समुपदेनासाठी हा दावा पाठविला. त्यानंतर दोघांचे समुपदेशन केले. त्यावेळी दोघांना एकमेकांशी संसार करायचा नाही. ते दोघे एकत्र राहणे शक्य नाही, असा अहवाल समुपदेशकांनी न्यायालयात दिला. पोटगीबाबत दोघात तडजोड झाली आहे, हे पाहून न्यायालयाने दावा निकाली काढला. या प्रकरणात माधवकडून ऍड. रवींद्र पाटोळे, माधवीकडून ऍड. विजया मनोहर अकोलकर यांनी काम पाहिले.