मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद पाटील यांनी नागरिकांच्या समस्यांवरून आता राज्यातील शिंदे सरकारवर टीका केली आहे. कारण एकनाथ शिंदे गट आणि भाजपा मिळून नवीन सरकार सत्तेवर येण्याला आता जवळपास दीड महिना होत आला आहे. मात्र अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. त्याच पार्श्वभूमीवर मनेसचे आमदार प्रमोद पाटील यांनी देखील शिंदे सरकारवर सडकून टीका केली आहे.
मनसेचे आमदार प्रमोद पाटील यांनी ट्विटरवरून सरकारवर टीका केली आहे. त्याची त्यांनी एक ट्विट केले आहे. त्यात पाटील यांनी,“बंड झाले, आता थंड झाले? पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत, मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय, सर्वकाही ठप्प आहे. तुमचं सर्व ओक्के आहे हो, पण लोकांचे सण आलेत. रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी, रोगराई वाढत आहे. याकडे कोण बघेल?” असे पाटील यांनी म्हटले आहे.
बंड झाले,आता थंड झाले ?
पालिकेत नगरसेवक नाहीत, जिल्हाला पालकमंत्री नाही, राज्याला मंत्री नाहीत,मंत्रालयाचे पुन्हा सचिवालय झालंय,सर्वकाही ठप्प आहे.
तुमचं सर्व ओक्के आहे हो,पण लोकांचे सण आलेत.रस्त्यांवरचे खड्डे, वाहतूक कोंडी,रोगराई वाढत आहे.याकडे कोण बघेल ?@mieknathshinde
— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) August 8, 2022
ठाण्यातील वाहतूक कोंडी, रस्त्यांवरील खड्ड्यांसह विविध समस्यांवरून आमदार पाटील यांनी टीका केली आहे. मागील काही दिवसांपासून या समस्यांमुळे नागरिक प्रचंड हैराण आहेत. शिवाय, पावसाळा असल्याने रोगराईचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. यामुळे लवकरात लवकर हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जबाबदार मंत्री, नगरसेवकांची आवश्यकता आहे.
विशेष म्हणजे, डोंबिवली- कल्याण लोकसभा मतदार संघात काल परवा पर्यंत खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर टीकेची एकही संधी न सोडणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीण मतदार संघाचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी शिंदे सरकारचां विश्वासदर्शक ठराव मंजुरीच्या बाजूने केलेले मतदान ठाणे जिल्ह्यात नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणारे ठरेल अशी शक्यता वर्तवली जात आहे. या नव्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजू पाटील आणि खासदार शिंदे यांच्यात दिलजमाई झाल्याचं वृत्त असून मनसेला नव्या मंत्री मंडळात स्थान मिळण्याची शक्यताही व्यक्त होत आहे.