रांची: झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राजकीय उलथापालथ आणखी तीव्र झाली आहे. झारखंडचे मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सरयू राय यांनी बंडखोरी केली आहे. रविवारी जमशेदपूर येथे आपल्या समर्थक आणि कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर त्यांनी जमशेदपूर पूर्व जागेवर मुख्यमंत्री रघुबर दास यांच्याविरोधात आणि त्यांच्या जुन्या जमशेदपूर पश्चिमेकडील मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली.
राय जमशेदपूर पूर्वममध्ये स्वत: सक्रियपणे प्रचाराचा कार्यभार स्वीकारतील. ते जमशेदपूर पश्चिम जागेवर लढतील. राय यांनी शनिवारी पक्षाच्या नेतृत्वाला आपल्या नावाचा विचार करु नका, असा सल्ला दिला. त्यांच्या उमेदवारीला किमान जमशेदपूर पश्चिम जागेवर विरोधी पक्षांचा पाठिंबा मिळेल, असा दावा राय यांनी पत्रकार परिषदेत केला. राय यांच्या बंडखोरीनंतर आता पक्ष लवकरच आपला अधिकृत उमेदवार जाहीर करेल अशी अपेक्षा आहे.
जमशेदपूर पश्चिम येथील दोन वेळा आमदार असलेल्या सरयू राय यांनी दुसऱ्या विधानसभा मतदार संघात उडी घेतल्यानंतर ही स्पर्धा नक्कीच रंजक होणार आहे. परंतु ही स्पर्धा खरंच चुरशीची असेल किंवा केवळ प्रचारापुरती मर्यादित असेल, हे इतर पक्ष, विशेषत: झारखंड मुक्ती मोर्चा आणि एजेएसयू यांच्या पाठिंब्यावर अवलंबून असेल. तसेच जमशेदपूर पूर्व जागेवर कॉंग्रेस पक्षाने त्यांचे प्रवक्ते प्रोफेसर गौरव वल्लभ यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे हि लढाई आणखी रंगतदार होणार आहे.
झारखंडच्या राजकारणात असे प्रथमच होईल जेव्हा कॅबिनेट प्रमुख म्हणजेच मुख्यमंत्र्यांना त्यांच्या कॅबिनेट मंत्र्यांद्वारे आव्हान दिले जाईल. राय यांना तिकिट मिळणे अवघड वाटत होते. कारण मुख्यमंत्री रघुबर दास त्यांच्या उमेदवारीला कोणत्याही प्रकारे पाठिंबा देत नव्हते. पक्षाच्या उमेदवारीसाठी झालेल्या मध्यवर्ती बैठकीत अनेक कारणांसाठी राय यांच्यावर आधीच संतप्त असलेले राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनीही तिकीट त्यांचे तिकीट कापणे योग्य समजले होते.