शंकर दुपारगुडे
परजणे, वहाडणे, साळुंखे निवडणुकीच्या रिंगणात
कोपरगाव – कोपरगाव विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी आठ अपक्ष उमेदवारांनी आपले अर्ज माघार घेतले. निवडणुकीच्या रिंगणात तब्बल 14 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. विद्यमान आमदार स्नेहलता कोल्हे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आशुतोष काळे यांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. आपणच पक्षाचे खरे निष्ठावंत आहोत, असे सांगत आपल्याच पक्षाच्या विरोधामध्ये बंडखोरी करण्याचे काम कोपरगावमध्ये या निवडणुकीत दिसून येत आहे.
गृहनिर्माणमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी नगर जिल्ह्यामध्ये कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचा पराभव करून 12 -0 अर्थात महायुतीच्या 12 जागा निवडून आणण्याचा चंग बांधला आहे. असे असताना आता कोपरगाव मतदारसंघांमध्ये त्यांचेच मेहुणे गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे यांनी भाजपच्या उमेदवाराविरोधात आपली फौज तयार करून उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. विखे पाटील परिवाराच्या शब्दाच्या पुढे न जाणारे परजणे या विधानसभेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून कोणाचा पत्ता कट करणार आणि कोणाला बळ देणार की स्वतः बलवान होणार, त्यांना बलवान होण्यासाठी कोणाकोणाची ताकद मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे.
राज्यात सेना-भाजप महायुतीची गाडी तुफान धावत असताना परजणेंनी या गाडीला आपली रिक्षा आडवी घातली आहे. मी भाजप व मोदी विचाराचा आहे, असेही ते मतदारसंघात सांगत आहेत. त्यामुळे भाजपच्या उमेदवाराच्या विरोधात परजणे यांची बंडखोरी आहे, हे आता लपून राहिले नाही. लोणीच्या गडावरुन पाठबळ मिळाल्याशिवाय परजणेंची रिक्षा पळणार तरी कशी, अशी चर्चा मतदारसंघात सुरू आहे. जर परजणे स्वविचाराने निवडणुकीत कार्यकत्यांच्या बळावर उतरले आहेत, तर विखेंनी दिलेल्या 12-0 या शब्दाचे काय, यावर तर्कवितर्क लढवले जात आहे.
त्याचप्रमाणे विजय वहाडणे हे मी जुना भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे. माझी निष्ठा भाजपबरोबर आहे. मोदी विचाराचे मंचकरी म्हणत मोदींच्या उमेदवाराच्या विरोधात आपली उमेदवारी कायम ठेवीत पक्षविरोधी शिट्टी वाजवायला सुरुवात केली आहे. ही पक्षाबरोबरची निष्ठा की चेष्टा आहे. दरम्यान, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या विरोधात बंड करत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक साळुंखे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवून काळे यांच्या विरोधात बंड केले आहे. शरद पवार यांच्यासाठी निष्ठेने काम करतो म्हणत साळुंके यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या घड्याळावर ट्रॅक्टर फिरवून बंडखोरी केली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या विरोधात निष्ठा म्हणून काम करणारा कार्यकर्ता ही नवी ओळख साळुंके यांची झाली आहे. दरम्यान कोपरगाव विधानसभा मतदारसंघांमध्ये 2019 ची निवडणूक चौरंगी स्वरूपामध्ये दिसण्याची शक्यता आहे. इतर अपक्ष उमेदवार कसा आपला प्रभाव टाकतील, हे पाहणे उत्सुकतेचे आहे. आमदार कोल्हे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकासाच्या बळावर निवडणुकीचा रिंगणामध्ये प्रचाराची यंत्रणा राबवत आहेत, तर आशुतोष काळे यांनी पंचायत समिती, साखर कारखाना यांच्या माध्यमातून केलेल्या विकासावर, तसेच माजी आमदार अशोक काळे यांनी दहा वर्षांमध्ये केलेल्या कामाच्या बळावरती निवडणुकीच्या रिंगणात आपली प्रचार यंत्रणा कार्यान्वित केली आहे. दोन साखर सम्राटांच्या विरोधात आपले स्वतंत्र सिटी वाजवण्याचे काम विजय वहाडणे यांनी सुरू केली आहे.
नगराध्यक्षपदाची लागलेली लॉटरी, मतदारांनी केलेला अचानक बदल त्या विश्वासावर आरूढ होऊन आमदारकीची निवडणूक चमत्कारिक होईल असा प्रयत्न हे करीत आहेत .त्यांच्या नगरपालिकेतील अडीच वर्षाच्या कार्यकाळात त्यांनी काय केले याचे मुद्दे प्रचारामध्ये घेत निवडणूक रिंगणात आपली तयारी केली आहे. परजणे यांनी काळे-कोल्हे यांच्या विरोधामध्ये प्रचार करीत, तुम्ही मला निवडून दिले तर कमी काळामध्ये जास्त विकास करू.
जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून विखे पाटील परिवाराच्या सहकार्याने केलेल्या कामाच्या बळावर निवडणुकीचा प्रचार करून वेगळा विचार रूजवण्याचा प्रयत्न करणार. दीपक साळुंके कोणत्या मुद्द्यावर निवडणूक लढवितात, कोणते प्रचाराचे मुद्दे राहतील याचीही उत्सुकता मतदारसंघांमध्ये लागली आहे.आमदार कोल्हे यांनी पाच वर्षांत केलेल्या विकास कामावर आपला आवाज मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. मतदार राजा कुणाच्या झोळीत दान माताच्या रूपाने देणार, हे निकालानंतरच कळेल. कितीही काही झाले, तरी काळे-कोल्हे यांना बंडखोरीचे ग्रहण लागले आहे. ते ग्रहण 21 तारखेला सुटेल.