मुंबई – शिवसेनेचे बडे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सेना आमदारांनी बंड पुकारले होते. विधान परिषद निवडणुका पार पडून ही मंडळी २१ जूनच्या रात्री सुरतला गेली. तेथून त्यांनी आपला मुक्काम गुहाटीला हलवला होता. गुहाटीतून गोव्यात आलेले हे आमदार बंडाला ११ दिवस उलटल्यानंतर अखेर महाराष्ट्राच्या भूमीमध्ये परतले आहेत.
१० दिवसांच्या या काळात महाविकास आघाडीला सुरुंग, उद्धव ठाकरे यांचा राजीनामा, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद, मी पुन्हा येईन म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांची उपमुख्यमंत्रीपदावर घसरण अशा वादळी घडामोडी घडल्या. अर्थात या राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू एकनाथ शिंदे व त्यांचे समर्थक आमदार हेच होते.
शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून फडणवीस हे त्यांचे डेप्युटी म्हणून काम करणार आहेत. नवनिर्वाचित सरकारला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक तसेच बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. याचसाठी आता बंडखोर आमदारांना महाराष्ट्रात परत बोलवण्यात आले आहे.
दरम्यान, गोव्याहून मुंबईत आणल्या गेलेल्या आमदारांच्या सुरक्षेसाठी मोठी पोलीस फौज तैनात करण्यात आली होती. शिंदे समर्थकांनी देखील विमानतळाबाहेर मोठी गर्दी केली होती. आमदारांना आता मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. येथे देवेंद्र फडणवीस त्यांना संबोधित करतील अशी माहिती मिळते.