पावसाने खरिपाचे अतोनात नुकसान : पेरा 20 टक्क्यांनी वाढणार
पुणे – राज्यात अवकाळी झालेल्या पावसाने खरिपाचे अतोनात नुकसान झाले असले, तरी आगामी रब्बीचा हंगाम मात्र यंदा शेतकऱ्यांसाठी लाभदायक ठरेल, असा अंदाज कृषी खात्याच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. यंदा साधारणात राज्यात दरवर्षी पेक्षा सुमारे 20 टक्के जास्त भूभागावर रब्बीच्या पेरण्या होतील अशी शक्यता आहे. त्याचबरोबर ज्वारी आणि हरभऱ्याचे क्षेत्र वाढेल.
यंदा रब्बीचे क्षेत्र तब्बल 70 लाख हेक्टरपर्यंत वाढण्याची शक्यता आहे. राज्यात दरवर्षी सरासरी 56 ते 57 लाख हेक्टर क्षेत्रावर रब्बीच्या पेरण्या होतात. गेल्या वर्षी दुष्काळामुळे हे क्षेत्र घटून फक्त 38 लाख हेक्टर झाले होते. यंदा मात्र त्यात वाढ होऊन हे क्षेत्र 70 लाख हेक्टर पर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. रब्बीच्या पिकांमध्ये ज्वारी आणि हरभऱ्याच्या पेरण्यांचे प्रमाण जास्त असेल असे कृषी आयुक्तांकडून सांगण्यात आले आहे. पावसामुळे विविध धरणातील पाणी साठ्यात वाढ झाली आहे, तसेच जमिनीमध्ये पाणी मुरल्याने त्याचा फायदा पेरण्यांना होणार आहे. त्यामुळेच यंदा रब्बीचा हंगाम चांगला होईल.
राज्यातील शेतकरी 56 ते 57 लाख हेक्टरच्या आसपास रब्बीच्या पेरण्या होतात. ज्वारीचे प्रमाण त्यात जास्त असते. शेतकरी ज्वारीच्या 15 ते 20 टक्के क्षेत्राला हरभऱ्याकडे वळतील. राज्यात सरासरी 14 लाख हेक्टरवर रब्बी हरभरा घेतला जातो अशी माहिती कृषी आयुक्तांनी दिली. शेतकऱ्यांनी 2017-18 च्या रब्बी हंगामामध्ये हरभऱ्याच्या पेरण्यांमध्ये वीस लाख हेक्टरने वाढ केली आहे, मात्र गेल्या हंगामात हा आकडा घसरुन 13 लाखांवर गेला होता. आतापर्यंत साडेपाच लाखाच्या पुढे रब्बी पेरण्यात झाल्या आहेत.