आकस्मिकता निधीच्या मर्यादेत वाढ – मंत्रिमंडळाची मान्यता
मुंबई : खरीप हंगामात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयानि, तूर, कापूस, भाजीपाला आणि फळपिकांचे प्रचंड नुकसान झाले. अशा आपत्तीत शेतकऱ्यांना योग्य मदत मिळावी यासाठी आकस्मिकता निधीच्या मर्यादेत आता 5 हजार 350 कोटींपर्यंत वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज घेण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्याचा आकस्मिकता निधी हा मुंबई आकस्मिकता नियम, 1956 अन्वये स्थापन करण्यात आला आहे. त्याची कायमस्वरुपी मर्यादा 150 कोटी आहे. या कायमस्वरुपी मर्यादेत तत्कालिक कारणांमुळे वेळोवेळी तात्पुरती वाढ करावी लागते. गेल्या खरीप हंगामात राज्यातील परतीचा अवकाळी पाऊस तसेच क्यार व महा वादळामुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
मुख्यत: भात, ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सोयाबीन, तूर, कापूस, भाजीपाला, फळपिके यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या निर्णयामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत वाटप करण्याकरीता 5 हजार कोटी व न्यायालयीन प्रकरणांसाठी 350 कोटी इतका निधी उपलब्ध करून देणे शक्य होणार आहे.