मुंबई – गेल्या वर्षी जुलैमध्ये रत्नागिरीमध्ये पावसाने 20 हून अधिक लोकांचा बळी गेल्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्हा प्रशासनाने पूर आणि भूस्खलनाची तात्काळ माहिती मिळण्यासाठी आणि संपर्कासाठी विविध ठिकाणी रिअल-टाइम डेटा एक्विझिशन प्रणाली स्थापित केली आहे. रत्नागिरी हा महाराष्ट्रातील एक किनारपट्टी जिल्हा आहे, या जिल्ह्यात सर्वत्र पावसाळ्यात मुसळधार पाऊस पडतो.
गतवर्षी जिल्ह्यातील चिपळूण शहराला अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला होता. जिल्ह्यातील 20 हून अधिक मृतांमध्ये 8 कोविड-19 रुग्णांचा समावेश आहे, पुराचे पाणी रूग्णालयाच्या आवारात घुसल्यानंतर त्यात त्यांचा मृत्यू झाला होता. रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी पीटीआयला सांगितले की, मानवी जीवितहानी आणि आर्थिक नुकसानीमुळे जिल्हा प्रशासनाला डेटा संकलन, विश्लेषण आणि अलर्ट जारी करण्यासाठी एक यंत्रणा बसवण्यास उद्युक्त केले. या प्रणालीचे जाळे जिल्ह्यातील सर्व अतिवृष्टी-प्रवण गावे, शहरे आणि धोकादायक ठिकाणी बसवण्यात आले आहे.
पावसाची आणि त्यामुळे पाण्याची पातळी कशी वाढली आहे, याचा रीअल-टाइम डेटा मिळण्यास त्यामुळे मदत होईल. त्यातून गावकऱ्यांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यासाठी त्यांना अलर्ट जारी करण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. धोक्याच्या स्थितीची वेळेत माहिती मिळाली तर लोक आपली जीवित व मालमत्तेची हानी वाचवू शकतील असे ते म्हणाले. जिल्हाधिकारी कार्यालयाने 406 गावे आणि ठिकाणे निश्चित केली असून जिथे ही यंत्रणा बसवली आहे. या ठिकाणी उपलब्ध माहितीच्या आधारे लाऊडस्पीकरच्या साहाय्याने ग्रामस्थांना सूचना दिल्या जाऊ शकतात, असे अधिकाऱ्याने सांगितले.
ही एक दुतर्फा संप्रेषण प्रणाली आहे. भूस्खलनामुळे एखादे गाव प्रभावित झाल्यास, स्थानिक अधिकारी आमच्याशी संवाद साधण्यासाठी या प्रणालीचा वापर करू शकतात. अशा घटनांदरम्यान मोबाइल टॉवरचा संपर्क तुटल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे त्यांना संपर्क साधण्यात येणारी अडचण दूर होऊ शकणार आहे.