प्रा. डॉ. वामन जाधव यांचा ‘संत परंपरा आणि कृषी संस्कृती’ हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे. एका वेगळ्या विषयाला स्पर्श करणारा हा ग्रंथ अनेक अर्थाने खूप महत्त्वाचा आहे. संत साहित्यावर बरेच लेखन झाले आहे. आजही होत आहे; पण एका विशिष्ट चौकटीतच हे लेखन होत आहे. संतांच्या काव्यातील सामाजिक जीवन, संतांच्या काव्यातील पर्यावरणाचा अभ्यास, संतांच्या काव्यातील भाषाशैलीचे विशेष असे घटक समोर ठेवून संत साहित्यावर संशोधन झाले आहे. संत साहित्याचा सर्वांगीण अभ्यास झाला असे आपणास म्हणता येणार नाही. मुळातच संत साहित्याचे अभ्यासक खूप कमी आहेत आणि त्यातील बहुतांश सांप्रदायिक विचारापलीकडे गेलेले नाहीत. अशा परिस्थितीत वामन जाधव यांनी ‘संत परंपरा आणि कृषी संस्कृती’ या ग्रंथाचे लेखन केलेले आहे. संतांचा आणि कृषिसंस्कृतीचा कसा संबंध होता हा विचार या ग्रंथाच्या केंद्रस्थानी आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत रामदास, संत नामदेव, संत चोखामेळा, संत सावतामाळी, संत गोरा कुंभार अशा संतांच्या काव्यातील कृषिजाणीवा कशा व्यक्त झाल्या आहेत ते लेखक आणि सोदाहरण सांगितले आहे. कृषि संस्कृतीमध्ये दुष्काळ हा एक महत्त्वाचा घटक आहे. दुष्काळाला फार मोठी परंपरा आहे. लहान दुष्काळ, मोठा दुष्काळ, कवठी दुष्काळ, बारभाई दुष्काळ, दुर्गादेवीचा दुष्काळ अशी दुष्काळाची परंपरा कृषिसंस्कृतीला आहे. संतांनी या दुष्काळाकडे कसे पाहिलं आहे हे लेखकाने सांगितले आहे. संत तुकारामांनी कृषिसंस्कृतीला सजग भान दिले आहे. दुष्काळात पिके कशी जपावीत, पाण्याचे नियोजन कसे करावे, पाण्याचा पाट स्वच्छ कसा ठेवावा, चिमण्या-पाखरांपासून पिकाचे रक्षण कसे करावे, पेरणीसाठी बियांची निवड कशी करावी, शेतीची मशागत कशी करावी, पेरणीसाठी कोणता हंगाम निवडावा अशा अनेक सूचना संत तुकारामांनी केल्या आहेत. शिवाय तुम्ही आळशी राहू नका. शेतकऱ्यांनी जागृत असले पाहिजे असेही संत तुकारामांनी सांगितले आहे. शेतीच्या मशागतीच्या आड येणारा म्हसोबाचा दगड सावता माळ्याने बांधावर आणून ठेवला आणि जमीन सुपीक केली. संत परंपरा ही कर्मकांड मानणारी नव्हती असे लेखकाने आपले मत नोंदवले आहे. संत रामदास यांच्या काळातील दुष्काळाची तीव्रता अधिक होती. संत रामदासांनी या दुष्काळाकडे खूप गांभीर्याने पाहिले आहे. त्यांच्या काव्यातील दुष्काळ आजही वाचकांना अस्वस्थ करतो. असा हा दुष्काळ जसा रामदासांच्या काळात होता तसा दुष्काळ संत नामदेव, संत चोखामेळा यांच्या काळातही होता. प्रत्येक संताने आपल्या काळातल्या दुष्काळावर विवेचन केले आहे. या ग्रंथातला वारीवरचा लेख वाचनीय झाला आहे. पंढरपुरची वारी हा एक आनंद सोहळा आहे. लाखो लोक कोणतंही निमंत्रण नसताना एकत्रित येतात. चंद्रभागेच्या वाळवंटात समतेचा जागर करतात. माउली हा एकच शब्द त्यांच्या मुखात असतो. ऊन, वारा, पाऊस, थंडी याची तमा न बाळगता विठ्ठलाच्या ओढीने लोक पंढरपूरच्या दिशेने येतात. कळसाचे दर्शन घेतात. एकमेकांना उरावरी भेटतात. पांडुरंगापुढे आपले गाऱ्हाणे मांडतात. पुंडलिकाला आपला भाऊ मानतात. विठ्ठल रुक्मिणीला आपले मायबाप मानतात. चंद्रभागा आपली बहीण आहे ही त्यांची धारणा आहे. अशी वारीला येणाऱ्या वारकऱ्यांची मानसिकता लेखकाने चित्रित केली आहे. वारीचे स्वरूप, वारीची परंपरा, वारीचे महत्त्व अशा अनेक अंगाने हा लेख महत्त्वाचा आहे. ‘एका वारकर्याशी संवाद’ या लेखात वारकऱ्यांच्या मनातील भाव लेखकाने उलगडून दाखविला आहे. विठ्ठलाशी त्याचे असणारे अतूट नाते या लेखात अधोरेखित झाले आहे. ‘ओवीतून वारी’ या लेखातून संतांच्या जगण्यातले निरागसपण लेखकाने सांगितले आहे. संतांच्या अभंगांनी जसे शेतकऱ्याला जगण्याचे बळ दिले तसेच बळ लोकसाहित्याने दिले आहे. संतांनी आपल्या अभंगातून जशी निष्ठा आपल्या दैवतावर व्यक्त केली तशीच लोकसाहित्यातूनही आली आहे. पंढरी, संतमेळा, विठुराया, दिंड्या-पताका, ऊन-पाऊस हे सारे जग भावार्थ होऊन मराठी लोकगीतातून अवतरले आहे. खरेतर लोकगीतातील विठ्ठल हा प्रदीर्घ अशा अभ्यासाचा विषय आहे. वामन जाधव जाधवांनी मांडणीत लोकसाहित्याला दिलेले महत्त्व संत परंपरेचा आणि कृषिसंस्कृतीचा अनुबंध प्रकट करणारे आहे. आधुनिक संत गाडगेबाबा व तुकडोजी महाराज यांचे कर्माचे वेगळेपण सांगताना कृषिसंस्कृतीची आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वातील अनेक स्वभावविशेष लेखकाने सांगितले आहेत. प्राण्याबद्दल अपार करुणा असणारा साधू, देव, धर्म, ध्यानधारणा न सांगणारा, तीर्थाला जाऊनही देवळात न जाणारा, देवाला न मानणारा देवमाणूस अशी गाडगे बाबांची ओळख लेखकाने करून दिली आहे. संत तुकडोजी महाराज यांनी आपल्या लेखनातून भजन कीर्तनातून कृषिसंस्कृतीचे प्रबोधन केले आहे. जलव्यवस्थापन, वृक्षारोपण, ग्रामस्वच्छता, गावातील न्यायनिवाडे अशा अनेक कृषिसंस्कृतीतील घटकावर संत तुकडोजी महाराज यांनी प्रबोधन केले आहे. कृषिसंस्कृतीविषयी असणारी त्यांची तळमळ लेखकाने सांगितली आहे. संत परंपरेतले बहुतेक संत हे खेड्यातले होते. खेड्यातील जगणं त्यांनी अनुभवलं होतं. त्यांनी खेडं जवळून पाहिलं होतं. त्यामुळे कृषिसंस्कृतीमधला एकही घटक त्यांच्या नजरेतून सुटला नाही. समग्र कृषिसंस्कृतीचे दर्शन त्यांच्या काव्यातून घडते. ऊस, डाळिंब, द्राक्ष, ज्वारी, बैल, म्हैस, मांजर, घोडा अशा कृषिसंस्कृतीतील अनेक पिकांच्या, प्राण्यांच्या प्रतिमा त्यांच्या काव्यातून येतात. हे वामन जाधव यांनी बारकाईने पाहिले आहे. संत साहित्यात या ग्रंथाच्या रुपाने एक नवीन पाऊलवाट निर्माण झाली आहे. असे या निमित्ताने नोंदवता येईल. प्रा. वामन जाधव यांच्या पुढील लेखनाला शुभेच्छा!
-डॉ. मनोहर जाधव
संत परंपरा आणि कृषिसंस्कृती
लेखक- वामन जाधव
हर्मिस प्रकाशन, पुणे
पृ. १०४