प्रगतीच्या दिशेने नेणारा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपलं राज्य कोणत्या दिशेने नेणार आहोत याची दिशा अर्थसंकल्पातून ठरवली जाते. सर्वसामावेशक असा हा अर्थसंकल्प आहे. समाजातील सर्व घटक स्तर, शिक्षण आरोग्य, सुविधा, पाणी, शेती, आरोग्य, कामगार, शेतकरी यांचा विचार करून अर्थसंकल्प मांडला आहे. एकूणच संपूर्ण देशात आणि जगात मंदीचं अर्थजगतात वातावरण निरुत्साही वातावरण आहे. याला कोण कारण आहे; या राजकारणात जायचं नाही. अशा या परिस्थितीत, त्यातही कमी पडतेय की काय… जगभरात करोना व्हायरसचं संकट आहे. अशा परिस्थितीत मुकाबला करीत राज्याला प्रगतीच्या दिशेने नेण्याचं काम हा अर्थसंकल्प करणार आहे.
आम्ही आकड्यांशी खेळणारे नाही – अजित पवार
आकड्यांशी खेळणारे आम्ही लोक नाही. शब्दांचे आणि आकड्यांचे खेळ करत नाही. आकड्यांशी खेळणारे कोण आहेत हे त्यांना माहीत आहे. जे काही देता येईल तेच देण्याचा प्रयत्न केला आहे, असे सांगताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विदर्भ, मराठवाड्याला काहीच न दिल्याचा आरोप फेटाळून लावला. मराठवाडा ग्रीड ही तिथल्या पाणीपुरवठ्यासाठीचीच योजना असून शेतकरी कर्जमाफी, पेट्रोल-डिझेलवर लावलेल्या ग्रीन सेसचे पैसे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठीच असल्याचे स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांचे दावे खोडून दाखवत आधीचा अर्थसंकल्प आणि आताचा अर्थसंकल्प याची फोड करून दाखविली. भाजपचा अर्थसंकल्पीय अंदाज 3 लाख 14 हजार 600 कोटींचा होता; परंतु सुधारीत 3 लाख 9 हजार 880 कोटींचा झाला. आताचा आमचा 3 लाख 47 हजार 456 कोटींचा आहे; महसुली जमा त्यांनी 3 लाख 34 हजार कोटी दाखवली. आम्ही 3 लाख 56 हजार कोटी दाखविली. भांडवली जमा त्यांनी 63 हजार 692 कोटी दाखवली आम्ही 57 हजार 30 कोटी भांडवली जमा दाखविली. आम्ही उगाच आकडे फुगवून दाखवलेले नाही. जे जमू शकेल शक्य आहे तेच दाखवले आहे, असे ते म्हणाले.
अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसावर बोजा – देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
पेट्रोल डिझेलवर एक रुपया वाढ करण्याच्या योजनेमुळे सर्वसामान्य माणसावर परिणाम होणार आहे. इंधन दरवाढीमुळे मालवाहतुकीवर, वस्तुंच्या भावांवर, शेतमालाच्या वाहतुकीवर व अन्य खर्चावर परिणाम होते. या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसावर बोजा लादण्याचे काम केले आहे. हे अर्थसंकल्पाचे भाषण नव्हे तर जाहीर सभेतील भाषण होते. अर्थसंकल्पाच्या भाषणात वित्तीय तूट, कर्ज उभारणी किती, कर्जाचा बोजा किती, अपेक्षित तूट अर्थसंकल्पात मांडायचा असतो. पण आकडेवारी मांडण्यात आलेली नाही. आकडेवारी लपवण्याचे काम अर्थमंत्र्यांनी केले आहे.
सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारा अर्थसंकल्प – प्रविण दरेकर
डिझेल व पेट्रोलवर करवाढ केली. करवाढीच्या माध्यमातूल लोकांच्या खिशातून पैसे काढण्याचे काम केले आहे. सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. अर्थसंकल्पात एकही नवीन आदिवासी योजना नाही. आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळ असूयेपोटी बंद केले. पायाभूत सुविधांबाबत सरकारकडे कोणत्याही संवेदना नाहीत. कोकणातील काज व फळ प्रक्रियेला केवळ 15 कोटी रुपये दिले आहेत. नागरी तसेच ग्रामीण सडक योजना व मेट्रोसाठी अपुऱ्या तरतुदी केल्या आहे. पुरेशी आर्थिक तरतूद नसलेला अर्थसंकल्प आहे. धनगर समाजालासुद्धा केराची टोपली दाखवण्यात आली आहे. पुढाऱ्यांपुरता हा अर्थसंकल्प आहे. भुलभुलैया करणार अर्थसंकल्प आहे, अशी प्रतिक्रिया विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी दिली.
दिशाभूल करणारा अर्थसंकल्प – सुधीर मुनगंटीवार
राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या अर्थसंकल्पाचे वर्णन “खोदा पहाड, निकला छोटेसे चूहे का टुकडा’ असे करावे लागेल, अशी टीका माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केली. हा अर्थसंकल्प सर्वसामान्य जनतेला भ्रमीत करणारा दिशाहीन अर्थसंकल्प आहे. अर्थसंकल्प सादर करण्याआधी अर्थमंत्री अजीत पवार यांनी त्यांचेच 2017मधील भाषण वाचयला हवे होते. अर्थमंत्र्यांनी केंद्र सरकारकडून 8 हजार कोटी रुपये कमी आल्याचे सांगितले. मात्र केंद्राकडून वाढीव स्वरूपात आलेल्या 17 हजार कोटीच्या अनुदानाची गोष्ट सांगण्यास ते सोईस्कररित्या विसरले. अर्थमंत्र्यांनी 31 हजार 343 कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प सादर करत मंदी असल्याचे कारण पुढे केले आहे. मात्र यावर उपाययोजना सांगितल्या नाही. फक्त अधिकाऱ्यांनी लिहून दिलेला अर्थसंकल्प अर्थमंत्र्यांनी वाचून दाखविल्याने राज्याला दिशा तर दिली नाही. मात्र राज्याची दिशाभूल केली आहे, आरोप मुनगंटीवार यांनी केला.