नवी दिल्ली – भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या कोलकाता येथील रोड शोवेळी काल तुफान राडा झाला. भाजप आणि तृणमूल कॉंग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याने रोड शो पूर्णत्वास जाऊ शकला नाही. राड्यावेळी दगडफेक आणि जाळपोळीचे प्रकार घडले. दरम्यान, शहांना कुठलीही इजा पोहोचली नाही. रोड शो सुरू असताना एका महाविद्यालयाच्या वसतिगृहातून शहा यांच्या ताफ्यावर तृणमूलच्या कथित कार्यकर्त्यांनी दगडफेक केली. त्यानंतर तृणमूल आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जुंपली. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वाराबाहेर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. तिथे लावण्यात आलेल्या अनेक दुचाकींची त्यावेळी मोडतोड करण्यात आली. तसेच, अनेक दुचाकी देखील पेटवून देण्यात आल्या.
BJP President Amit Shah on violence at his roadshow in Kolkata yesterday: Had CRPF not been there, it would have been really difficult for me to escape, BJP workers were beaten up, TMC can go to any extent, it’s with luck that I made it out. #WestBengal pic.twitter.com/GksBpZA2iY
— ANI (@ANI) May 15, 2019
दरम्यान याच पार्श्वभूमीवर आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी आज एका पत्रकार परिषदेद्वारे काल कोलकात्यात भडकलेल्या हिंसेचे बिंग तृणमूल काँग्रेसवर फोडले. ते म्हणाले, “काल पश्चिम बंगालमध्ये भडकलेल्या हिंसेबद्दल ममता बॅनर्जी आम्हाला दोषी सांगत आहेत मात्र आम्ही संपूर्ण देशात निवडणूक लढवत असून तृणमूल केवळ पश्चिम बंगालमधील 42 जागांवर निवडणूक लढवत आहे. देशभरात आतापर्यंत लोकसभा निवडणुकांचे सहा टप्पे पार पडले मात्र कुठेही हिंसा झाली नाही मग पश्चिम बंगलमध्येच हिंसा कशी काय झाली? याचाच अर्थ असा की तृणमूल या हिंसेसाठी कारणीभूत आहे.” यावेळी बोलताना शहा यांनी काल हिंसा भडकल्यानंतर सीआरपीएफच्या जवानांनी आपली तेथून सुटका करण्यात मदत केल्यानेच आपण सुखरूप आहोत असं देखील सांगितलं.