कोल्हापूर: निसर्ग चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेली मदत तोकडी असल्याचे म्हणत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका केली होती. या टीकेला ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले आहे.
काही प्रसारमाध्यमांनी केलेल्या सर्वेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री ठरले. हे देवेंद्र फडणवीस यांना खटकल्यानेच त्यांनी ही टीका केल्याचा टोला मुश्रीफ यांनी लगावला. तसेच देवेंद्र फडणीस यांनी मनशांतीसाठी आध्यात्मिक पुस्तकं वाचावीत, असा खोचक सल्लाही दिला.
हसन मुश्रीफ म्हणाले, ज्या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पाहणी केली तेव्हा 100 कोटी रुपयांची तात्पुरती मदत जाहीर करतानाच त्यांनी सांगितले होते, की पंचनामे झाल्याशिवाय ठोस मदत घोषित करता येणार नाही.
मात्र, शासनाच्या अत्यावश्यक कामांसाठी त्यांनी 100 कोटी रुपयांची घोषणा केली. तत्काळ पंचनामे करून जितकं नुकसान झाले असेल तितकी मदत देण्याचे सरकार प्रयत्न करेल, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले होते. असे असतानाही देवेंद्र फडणवीस जी वक्तव्यं करत आहेत, ती हास्यास्पद आहेत.
करोना विषाणूविरोधात 200 राष्ट्रं झगडत आहेत, संघर्ष करत आहेत. असं असताना आपल्या राज्यात करोनाचं संकट नियंत्रणात आणलेले आहे. यातच सर्व्हेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 5 व्या क्रमांकाचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हटले आहे. मला वाटतं हीच गोष्ट फडणवीस यांना खटकली असावी.
जेव्हा जेव्हा करोनाचे रुग्ण किंवा मृत्यू कमी होतात तेव्हा तेव्हा हे लपवाछपवी सुरू असल्याचा आरोप करतात. म्हणून माझी आजही त्यांना विनंती आहे की मौनः सर्वार्थ साधनम् हे पुस्तक वाचावं. मनाला शांती लाभायची असेल तर मौन हा सर्वात उत्तम पर्याय आहे. प्रतिकूल काळात अध्यात्म हाच उपाय आहे, अशा शब्दात त्यांनी खडेबोल सुनावले.