मुंबई : केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांचे मागील दोन महिन्यांपासून आंदोलन सुरुच आहे. शेतकरी आंदोलनावर इंटरनॅशनल पॉपस्टार रिहाना आणि पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने ट्विट केल्यानंतर शेतकरी आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजले आहे. त्यानंतर भारतातील सेलिब्रेटींनी ट्विट करत हा आमचा अंतर्गत मुद्दा असल्याचे म्हटले. मात्र सेलिब्रेटींवर दडपण टाकून ट्विट करायला लावल्याचा संशय व्यक्त करत राज्य सरकारने याची चौकशी करण्याचे आदेश दिले. यावरून केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
रिहाना हिच्या ट्विटला उत्तर देताना गानसम्राज्ञी लता मंगेशकर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी सडेतोड उत्तर दिलं. त्याचा अभिमान वाटायचा सोडून महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने या सेलिब्रिटींच्या ट्विटची चौकशी करण्याचा घेतलेला निर्णय चुकीचा आहे. असं सांगतानाच सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर यांना त्यांचं मत मांडण्याचा अधिकार नाही काय? असा सवाल रिपाइं नेते आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला आहे.
सचिन तेंडुलकर, लता मंगेशकर हे भारतरत्न या सर्वोच्च किताबाचे मानकरी आहेत. त्यांना स्वतःचे विचार आहेत. त्यांनी शेतकरी आंदोलनावरून परकीय कलाकारांना सुनावले हे योग्य झाले. भारतरत्न लाभलेल्या महनीय व्यक्तींच्या मतांचा आपण सन्मान केला पाहिजे. मात्र महाविकास आघाडी सरकारने या महनीय व्यक्तींच्या ट्विट केलेल्या मतांची चौकशी करण्याचा निर्णय घेणे म्हणजे त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणण्यासारखे आहे. त्यांना आपली मते मांडण्याचा अधिकार नाही का?. असा सवाल आठवले यांनी उपस्थित केला.