मुंबई: जागतिक अस्थिरता आणि लोकसभेच्या निवडणुकांमुळे शेअरबाजारातील वातावरण अस्थिर आहे. त्यामुळे बुधवारी शेअरबाजार निर्देशांकांत घट झाली. नऊ दिवसांनंतर काल शेअरबाजार निर्देशांकांत थोडीफार वाढ झाली होती. मात्र, आज पुन्हा नफेखोरी झाली.
बुधवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 203 अंकांनी कमी होऊन 37,114 अंकांवर बंद झाला तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 65 अंकांनी कमी होऊन 11,170 अंकांवर बंद झाला. येस बॅंक आणि टाटा मोटर्सला आजच्या विक्रीचा सर्वात जास्त फटका बसला. धातू, दूरसंचार, ऊर्जा, वाहन, बॅंकिंग क्षेत्राचे निर्देशांक 2.08 टक्क्यांपर्यंत कमी झाले. मात्र, माहिती तंत्रज्ञान क्षेत्राची आगेकूच चालू आहे. बुधवारी मिडकॅप व स्मॉल कॅप 0.67 टक्क्यापर्यंत कमी झाले. मंगळवारी परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी 2011 कोटी रुपयांच्या शेअरची विक्री केली तर देशातील संस्थागत गुंतवणूकदारांनी 2242 कोटी रुपयांच्या शेअरची खरेदी केली. मात्र तरीही वातावरण
सुधारले नाही.
शेअरबाजारात खरेदीसाठी सध्या अजीबात पूरक वातावरण नाही. जागतिक व्यापारयुद्ध व लोकसभेच्या निवडणुकामुळे गुंतवणूकदार कुंपणावर बसून आहेत. त्यातच क्रुडच्या किमती वाढत आहेत हा गुंतवणूकदारांच्या दृष्टिकोनातून चिंतेचा विषय आहे.
हेमांग जानी, सल्लागार प्रमुख, शेअर खान