नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील वाद चर्चेनंतर सुटला असे वाटतं असताना चीनने पुन्हा भारतीय सीमेवर केलेली सैन्याची जमवाजमव केल्याचे दिसत आहे. तसेच चीनचे हे कृत्य दोन्ही देशात झालेल्या कराराचा भंग असल्याचा आरोप भारताने केला आहे. परराष्ट्र मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात भारताने हा चीनच्या सीमेवरील सैन्याच्या आणि शस्त्रास्त्रांच्या जमवाजमवीला हरकत घेतली आहे. मागच्याच आठवड्यातील हिंसक झटापटीत 20 भारतीय सैनिक शहीद झाले होते. त्यानंतर दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर अनेक चर्चा झाल्या. यामुळे दोन्ही देशांमधील तणाव निवळत आहे, असं वाटत असतानाच चीनने पुन्हा सीमेपलीकडे सैन्याची आणि युद्धसाहित्याची आवक वाढवली आहे.
एका इंग्रजी वर्तमानपत्राने याविषयी माहिती दिली आहे. उपग्रहाने काढलेल्या या परिसराच्या फोटोनुसार, चीनने या परिसरात एक तळ उभारला आहे. चीनी सैन्याचा हा तळ गलवान खोऱ्यात जिथे भारत आणि चीन यांच्यात चकमक झाली त्याच ठिकाणी असल्याचे स्पष्ट दिसते. उपग्रहातून घेतलेल्या छायाचित्रात काही तंबू दिसतात, त्याखाली काही बांधकाम सुरु असावे असा संशय एका इंग्रजी वर्तमानपत्राच्या बातमीत व्यक्त करण्यात आला आहे. कारण या सॅटेलाईटद्वारे काढलेल्या या चित्रात बांधकामाच्या ठिकाणी असतात तशा भिंती आणि बॅरिकेट्स असल्याचेही दिसत असल्याचे म्हटले जात आहे.
चीन आणि भारत यांच्यात असलेल्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषा म्हणजेच LAC च्या चीनकडील बाजूला गेल्या महिनाभरापासून चीनने सैन्य आणि युद्ध साहित्याची आवक वाढवली आहे. चीन आणि भारत यांच्यातील सीमा निश्चित नसल्यामुळे चीनकडून अनेकदा भारतीय हद्दीतल्या ठिकाणांवर अतिक्रमण होत आहे. 1993 साली दोन्ही देशात झालेल्या द्वीपक्षीय करारानुसार, दोन्ही देशांना सीमेवर एका मर्यादेपेक्षा जास्त सैन्य जमा करता येत नाही.