नवी दिल्ली – धनुष्यबाण कुणाचा आणि शिवसेना पक्ष कुणाचा? या तिढ्यासंदर्भातील निकाल केंद्रीय निवडणूक आयोगात शुक्रवारी देखील प्रलंबित राहिला. शिंदे आणि ठाकरे गट अशा दोन्ही गटांचा युक्तीवाद ऐकूण घेतल्यानंतर आयोगाने सोमवार पर्यंत (दि.23) दोन्ही गटांकडून लेखी उत्तर मागविले आहे. योगायोग म्हणजे याच दिवशी उद्घव ठाकरे यांचा पक्षप्रमुखपदाचा कार्यकाळ संपणार आहे. दोन्ही गटांकडून लेखी उत्तर मिळाल्यानंतर, त्याच्या पुढील सोमवारी (दि.30) आयोग आपला निकाल देण्याची शक्यता आहे.
या प्रकरणातील सुनावणीचा आजचा केंद्रीय निवडणूक आयोगातील तिसरा दिवस होता. यापूर्वी, 10 जानेवारी, 17 जानेवारी त्यानंतर आज 20 जानेवारीलाही निवडणूक आयोगाने पुढील तारीखच दिली आहे. मागच्या वेळी ठाकरे गटाने पुढची तारीख मागून घेतली होती. शुक्रवारी ठाकरे गटाकडून जेष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल व देवदत्त कामत यांनी तर शिंदे गटाकडून महेश जेठमलानी व मनिंदर सिंग यांनी युक्तीवाद केला.
सिब्बल यांनी, “शिंदे गटाने राष्ट्रीय कार्यकारिणी निवडणूक आयोगात जाण्यापूर्वी केवळ एक दिवस आधी घेतली, त्याला काहीही अर्थ नाही, त्यामुळे हा सगळा वाद म्हणजे देशाच्या लोकशाही रचनेची थट्टा आहे,’ असे आपल्या एक तासाच्या युक्तीवाद म्हटले. शिंदे गटाकडून महेश जेठमलानी यांनी युक्तिवादात, “उद्धव ठाकरेंनी युतीच्या नावावर मते मिळवत, नंतर महाविकास आघाडी स्थापन कशी केली’, असा प्रश्नही उपस्थित केला.
शाब्दीक चकमक
युक्तीवादा दरम्यान शिवसेनेच्या प्रतिनिधी पदाच्या मुद्यावरून शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी व ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक झाली. त्यानंतर आयोगाच्या मध्यस्थीनंतर वातावरण शांत करण्यात आले.
दोन्ही गटाकडून प्रतिज्ञापत्रे सादर
शिवसेनेच्या ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे आतापर्यंत 160 राष्ट्रीय कार्यकारणी प्रतिनिधी, 2,82,975 संघटनात्मक प्रतिनिधी, 19,21,815 प्राथमिक सदस्य अशा एकूण 22 लाख 24 हजार 950 पक्षसंघटनेच्या पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे सादर केली आहे. तर शिंदे गटाने 12 खासदार, 40 आमदार, 711 संघटनात्मक प्रतिनिधी, 2046 स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधी आणि 4,48,318 प्राथमिक सदस्य अशा 4,51,127 पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आयोगाकडे सादर केली आहेत.
दोन्ही बाजूंचे युक्तीवाद
ठाकरे गट (कपिल सिब्बल, देवदत्त कामत)
– 20 जूनला शिवसेनेत बंड झाले असताना 19 जुलैला शिंदे गट निवडणूक आयोगात का आला?
– बंडानंतर महिनाभर शिंदे गट शांत का होता?
– बंडानंतरच्या दोन बैठकांना आदेशानंतरही शिंदेंची गैरहजरी
– निवडणूक आयोगात येण्यापूर्वी एक दिवसपूर्वी प्रतिनिधी सभा घेतली
– राष्ट्रीय कार्यकारणीला मुदतवाढ द्या किंवा निवडणूक घ्या
– विधिमंडळ आणि संसदेत आमचीच संख्या अधिक
– प्रतिनिधी सभाच पक्ष चालवतो, पक्ष सोडून गेलेले सभेचा भाग होऊ शकत नाहीत.
– शिंदे गटाची प्रतिनिधी सभा घटनाबाह्य
– शिंदे गटाच्या कागदपत्रांमध्ये कमतरता, 68 पैकी 28 जिल्हाप्रमुखांची पत्रे नाहीत.
शिंदे गट (महेश जेठमलानी,मनिंदर सिंग)
– उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडी कशी बनवली?
– प्रतिनिधी सभा केवळ ठाकरे गटाची कशी असू शकते?
– ठाकरेंनी युतीचे आश्वासन देऊन मते मिळवली व जनतेला वाऱ्यावर सोडले.
– शिंदेंचे मुख्यनेता पद कायदेशिरच
– शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत फुट
– आमच्या संख्येबाबत कोणताही वाद नाही
– पक्षघटनेचे आम्ही पालन केले