नगर – जिल्हा परिषद कार्यालयाच्या संरक्षक भिंतीलगत गेल्या अनेक वर्षापासून असलेली अतिक्रमणे मंगळवारी (दि.5) सकाळी महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने हटविली आहेत. अतिक्रमणे हटविल्यामुळे माळीवाडा ते इम्पिरिअल चौक दरम्यानच्या रस्त्याचा पुन्हा श्वास मोकळा झाला आहे.
जिल्हा परिषदेच्या व बसस्थानक बाजुने उभारण्यात आलेल्या संरक्षक भिंतीलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे झाली होती. चहा टपऱ्या, पान टपऱ्या, फळ विक्रीच्या हातगाड्या, तयार कपड्याची दुकाने अशी 40 च्या वर अतिक्रमण धारकांनी थाटली होती. त्यामुळे जिल्हा परिषद मुख्यालयाला असलेल्या तिनही प्रवेशद्वारामध्ये नेहमीच वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. त्याचबरोबर बसस्थानकाचे प्रवेशद्वार आणि जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार समोरासमोर असल्याने या प्रवेशद्वारात मोठ्या प्रमाणात रिक्षा उभ्या केल्या जातात.
रिक्षा रस्त्यावरच उभ्या राहत असल्याने बसस्थानक आणि जिल्हा परिषद अशा दोन्ही बाजूने रस्त्यावर वाहतूक कोंडी होत होती. त्यातच संरक्षक भिंतीलगतच्या अतिक्रमण धारकांच्या दुकानांमुळे रहदारीला अडथळा निर्माण होत होता. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असे. याबाबत मनपा प्रशासनाला ही अनेक वेळा नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. मात्र याकडे दुर्लक्ष केले जात होते. अतिक्रमणे हटविण्यासंदर्भात जिल्हा परिषदेने महापालिकेला पत्र देताच ही अतिक्रम काढण्यात आले.
अतिक्रमण विरोधी विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी (दि.5) मनपाच्या अतिक्रमण विभागाच्या पथकाने कारवाई करत अतिक्रमणे हटविली. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोर मोकळा रस्ता दिसून येत होता. या मोहीमेत महापालिकेच्या नगररचना व अतिक्रमण निर्मूलन विभागाचे उपअभियंता सुरेश इथापे, सुरेश मिसाळ, राहुल तनपुरे आदींसह 15 कर्मचारी सहभागी झाले होते.