चेन्नई – अर्थव्यवस्था विस्तारित होणे गरजेचे आहे. यासाठी रिझर्व्ह बॅंकेने गेल्या एका वर्षात बऱ्याच उपाययोजना केल्या आहेत. त्याचबरोबर गरज पडल्यास आणखी उपाययोजना करण्याची रिझर्व्ह बॅंकेची तयारी आहे, असे बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी म्हटले आहे.
स्थिरतेचा बळी जाऊ न देता विकास दर वाढता ठेवण्यासाठी उपाय योजना जारी राहतील असे त्यांनी सांगितले. पालखीवाला स्मृती व्याख्यानमालेत बोलताना दास म्हणाले की, रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या उपाययोजनांमुळे भारताची अर्थव्यवस्था स्थिर राहिली.
आगामी काळात विकास दर वाढेल. भारतातील इतर वित्तसंस्थांनी आगामी काळात वित्तिय स्थिरते वर परिणाम न होऊ देता विकास दराला चालना देण्याची गरज आहे. करोना व्हायरसचा बॅंकांच्या विविध क्षेत्रावर काय परिणाम झाला याचे मूल्यांकन करण्याची सूचना आपण बॅंकांना दिली आहे. त्या आधारावर पुढील उपाय योजना करता येतील.
भारत सरकारने आणि रिझर्व्ह बॅंकेने करोनासंदर्भात मदत करताना उधळपट्टी होणार नाही याची काळजी घेतली आहे. ज्यांना आवश्यकता आहे त्यांना मदत देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या तिमाहीत विकास दर कोसळल्यानंतर पुढील तिमाहीमध्ये परिस्थिती वेगाने पूर्वपदावर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या या प्रयत्नांमुळे विविध क्षेत्रावर जास्त परिणाम झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे वर्षाच्या अखेरीस विकासदर सकारात्मक पातळीवर राहील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. करोनामुळे निर्माण झालेल्या ऐतिहासिक पेचप्रसंगाचा सामना भारतीय अर्थव्यवस्थेचे यशस्वीरित्या केला असल्याचे ते म्हणाले.