मुंबई – अदानी समूहातील काही कंपन्यांनी देशातील बॅंकांकडून बरेच कर्ज घेतले आहे. देशातील बॅंकिंग व्यवस्था इतकी मोठी आणि बळकट आहे की अशा प्रकारच्या घडामोडीमुळे भारतीय बॅंकिंग व्यवस्थेवर कसलाही नकारात्मक परिणाम होणार नाही, याचा पुनरुचार रिझर्व्ह बॅंकेने केला आहे.
पत धोरणानंतर रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी सांगितले की, एखाद्या कंपनी संबंधात घडलेल्या काही घडामोडीमुळे एकूणच बॅंकिंग व्यवस्थेवर फारसा परिणाम होणार नाही. विविध बॅंकांनी अदानी समूहाला नेमके किती कर्ज दिले आहे याची आकडेवारी संकलित करण्यात आली आहे. ही आकडेवारी पाहता बॅंकिंग व्यवस्थेवर अदानी समूहातील नकारात्मक घडामोडी घडल्या तर परिणाम होणार नाही असे रिझर्व्ह बॅंकेने अगोदरच स्पष्ट केले आहे.
ज्या बॅंकांनी या समुहातील कंपन्याना कर्ज दिले आहे. त्या बॅंकांनीही या संदर्भात परिणाम होणार नसल्याचे निवेदन जारी केले आहे. आगामी काळात अदानी समूहातील कंपन्यांना कर्ज वाटप करण्यासंदर्भात काही मार्गदर्शक सूचना रिझर्व्ह बॅंकेने जारी केल्या आहेत का असे विचारले असता दास यांनी सांगितले की, सध्याच्या परिस्थितीत अशा मार्गदर्शक सूचना जारी करण्याची गरज नाही.
कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्र ऑस्ट्रेलियाशी सहकार्य करणार – उपमुख्यमंत्री फडणवीस
बॅंका कर्ज वाटप करताना विशिष्ट नियमाच्या आधारे कर्ज वाटप करीत असतात. आगामी काळामध्ये बॅंका निर्णय घेताना या नियमाच्या अंतर्गत आवश्यक ते निर्णय घेतील. भारतीय बॅंकांनी गेल्या पाच वर्षांत उत्तम कामगिरी केली आहे. त्यामुळे बॅंकांची अनुत्पादक मालमत्ता कमी झाली आहे. त्यामुळे बॅंकांना खराब कर्जापोटी कमी तरतूद करावी लागत आहे. अशा परिस्थितीत बॅंकांचा नफा वाढत आहे. त्यातल्या त्यात सार्वजनिक क्षेत्रातील बॅंकांचा नफा वाढला आहे. त्यामुळे सरकारला यावर्षी बॅंकांना भांडवली मदत करण्याची गरज भासणार नाही असे समजले जाते.