मुंबई – लक्ष्मीविलास बॅंकेची भांडवली परिस्थिती खराब झाली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने 3 सदस्यीय नवे संचालक मंडळ नेमले असून हे संचालक मंडळ व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याचे काम करील.
गेल्या आठवड्यात बॅंकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भागधारकांनी सात संचालकांच्या विरोधात मतदान केले. बॅंकेतील कर्ज वितरण कमी झाले आहे. कर्जाची वसुली कमी झाली आहे. त्याचबरोबर ठेवी कमी झाल्यामुळे भागधारकांनी संचालक मंडळाच्या विरोधात निर्णय घेतला. बॅंकेला भांडवलाची प्रचंड गरज निर्माण झाली असून भांडवल वाढण्यासाठी बॅंकेकडून प्रयत्न करण्यात येत आहेत.
अचानक झालेल्या या घडामोडीनंतर रिझर्व्ह बॅंकेने या प्रकरणात लक्ष घातले आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या संचालक मंडळाने काम सुरू केले असून बॅंकेच्या ग्राहकांना आणि ठेवीदारांना त्यांच्या ठेवी सुरक्षित असल्याचे म्हटले आहे. आगामी काळात बॅंकेच्या संदर्भात घेतलेल्या धोरणात्मक निर्णयाची माहिती वेळोवेळी ग्राहकांना उपलब्ध करण्यात येणार आहे.
बॅंकेने लघुउद्योगाऐवजी मोठ्या कंपन्यांना कर्ज देण्यास सुरुवात केल्यानंतर बॅंकेत प्रश्न निर्माण झाले. 2016 मध्ये बॅंकेतील ठेवी 794 कोटी रुपये असताना रणबक्षी कंपनीला तब्बल 720 कोटी रुपयांचे कर्ज मंजूर करण्यात आले होते.
बॅंकेवर अगोदरच निर्बंध
गेल्या आठवड्यात दिल्लीत पोलिसांनी लक्ष्मीविलास बॅंकेच्या दोन कर्मचाऱ्यांना ठेवी संबंधातील गैरव्यवहार केल्याबद्दल अटक केली होती. बॅंकेचे एनपीए मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे रिझर्व्ह बॅंकेने सप्टेंबर 2019 पासून या बॅंकेवर निर्बंध लावले आहेत. इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स कंपनीला बॅंकेचे अधिग्रहण करू द्यावे, असा प्रस्ताव बॅंकेने रिझर्व्ह बॅंकेकडे दिला होता. मात्र, रिझर्व बॅंकेने हा प्रस्ताव नाकारला. मार्च 2020 रोजी संपलेल्या वर्षामध्ये बॅंकेला 836 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.