उस्मानाबाद – भारतीय रिझर्व्ह बॅंकेने (RBI) सोमवारी उस्मानाबाद येथील वसंतदादा नागरी सहकारी बॅंकेचं लायसन्स रद्द केलं आहे. मंगळवारपासून या बॅंकेला कोणताही आर्थिक व्यवहार करता येणार नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. आरबीआयच्या या निर्णयामुळे खातेदारांमध्ये प्रचंड खळबळ उडालीय.
वसंतदादा नागरी सहकारी बॅंकेला आरबीआयच्या निर्देशांचे पालन करण्यात अपयश आल्याचा ठपका ठेवण्यात आलाय. अशा परिस्थितीत बॅंक सुरू ठेवणे म्हणजे ग्राहकांच्या ठेवींना धोक्यात टाकण्यासारखे आहे, असे आरबीआयने स्पष्ट केले आहे.
त्याचबरोबर राज्य सहकारी आयुक्त आणि सहकारी संस्था निबंधक यांना देखील बॅंकेच्या व्यवहारांना दिशा देण्याचा आदेश जारी करण्यात आला असून बॅंकेसाठी लिक्विडेटर नेमण्याची विनंती करण्यात आली आहे.
ठेवीदारांना पैसे परत मिळणार –
ठेवीदारांना दिलासा देताना आरबीआयने म्हटले आहे की, बॅंकेचे लायसन्स रद्द करणे आणि दिवाळकोरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांचे पैसे परत करण्यात येतील. लिक्विडीशनची प्रक्रिया सुरू होताच सर्व ठेवीदारांना ठेवी विमा आणि पत हमी काॅर्पोरेशनकडून नेहमीच्या अटी व शर्तींनुसार 50 हजारांच्या मर्यादेपर्यंतच्या ठेवीची परतफेड करण्याचा हक्क आहे. तसेच बॅंकेच्या बहुतांश ठेवीदारांना त्यांच्या ठेवींची संपूर्ण परतफेड डीआयसीजीसीकडून मिळेल.
वसंतदादा नागरी बॅंक आरबीआयने दिलेल्या निर्देशांचे व नियमांचे पालन करण्यात अपयसी ठरली आहे. बॅंकेची सध्याची आर्थिक स्थिती पाहता बॅंक आपल्या ठेवीदारांना त्यांच्या ठेवी देण्यास असमर्थ ठरेल. त्यामुले जनतेच्या हितासाठी बॅंकेचे कामकाज 11 जानेवारीपासून बंद करून बॅंकिंग परवाना रद्द केल्याचे आदेश काढले आहेत, असे आरबीआयने म्हटले आहे.