पीएमसी घोटाळा प्रकरण ः आरबीयाच्या वतीने आज अंतिम युक्तीवाद
मुंबई (प्रतिनिधी) – पंजाब आणि महाराष्ट्र बॅंक घोटाळ्याप्रकरणी खातेदारांचे पैसे बुडाले नाहीत, तर आरबीआयच्या हस्तक्षेपामुळे ते टळले, असे स्पष्ट मत उच्च न्यायालयाने आज व्यक्त केले. न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठाने रिझर्व्ह बॅंकेच्या अहवालानंतर हे मत व्यक्त केले.
आरबीआयने घातलेल्या निर्बंधांमुळे पंजाब आणि महाराष्ट्र बॅंकेतील (पीएमसी) खातेदारांना आपल्या खात्यातून रक्कम काढण्यात अनेक अडचणी येत आहेत. याशिवाय पीएनबी बॅंकेच्या घोटाळ्यामुळे आतापर्यंत चार खातेदारांचा मृत्यू झाला आहे.
आरबीआयने पीएनबी बॅंकेवर घातलेले निर्बंध हटवावेत, तसेच ग्राहकांना आपल्या खात्यातून जास्तीत जास्त रक्कम काढण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी करत प्राजक्ता वायकर यांच्या वतीने तमसीन मोनिस यांनी, तर कंन्झूमर ऍक्शन नेटवर्क, हरेश रायसिंगानी यांच्यासह तीन आणि एक जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत. या याचिकांवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या खंडपीठासमोर आज झाली.
यावेळी बॅंक खातेधारकांनी आता शेतक-यांप्रमाणे आत्महत्या करायच्या का?, असा सवाल काही खातेधारकांनी हायकोर्टात केला होता. कोर्टाने समिती स्थापन करून कर्जबुडव्या एचडीआयएलकडून जप्त केलेल्या मालमत्तेचा लवकरात लवकर लिलाव करत पीएमसी खातेधारकांची सारी रक्कम परत करण्याची तजवीज करावी, अशी प्रमुख मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली.
यावेळी न्यायालयाने आरबीआयने पीएमसी खातेधारकांचे पैसे बुडवले हा आरोप चुकीचाच असल्याचा पुनरूच्चार केला. याचिकाकर्त्यांच्या वतीने आज युक्तीवाद पूर्ण झाला असून उद्या आरबीयाच्या वतीने अंतिम युक्तीवाद करण्यात येणार आहे.