सातारा -भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षण घेतलेल्या येथील श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूलची शैक्षणिक गुणवत्ता वाढवण्यासाठी रयत शिक्षण संस्था आणि सातारा जिल्हा परिषद यांच्यात लवकरच होणाऱ्या सामंजस्य कराराबाबत गुरूवारी जिल्हा परिषदेत झालेल्या सहविचार सभेत शिक्कामोर्तब झाले.डॉ. आंबेडकर यांच्यासह दिग्गजांनी या हायकूलमध्ये शिक्षण घेतले.
नावलौकिक मिळालेल्या या शाळेत गेल्या काही वर्षांपासून विद्यार्थ्यांची संख्या घटली. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर, विद्यमान अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे, माजी सभापती राजेश पवार, माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर, प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रभावती कोळेकर यांनी या हायस्कूलला गतवैभव मिळवून देण्याचा चंग बांधला होता.
हायस्कूलच्या गुणवत्तावाढीसाठी रयत संस्थेचे शैक्षणिक सहकार्य घेण्याबाबतचा ठराव सर्वसाधारण सभेत संमत झाला होता. गुरूवारी उदय कबुले यांच्या अध्यक्षतेखाली सहविचार सभा झाली. यावेळी उपाध्यक्ष प्रदीप विधाते, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, मानसिंगराव जगदाळे, सौ. सोनाली पोळ, कल्पना खाडे, संजीवराजे नाईक निंबाळकर, दीपक पवार, धमेंद्र काळोखे, कार्यकारी अभियंता युवराज लवटे, रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, सचिव डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, राजेश क्षीरसागर, प्रभावती कोळेकर उपस्थित होते.
प्रतापसिंह हायस्कूलचे ऐतिहासिक महत्त्व सांगून जिल्हा परिषदेमार्फत याठिकाणी पुरवण्यात आलेल्या सुविधांची माहिती मानसिंगराव जगदाळे यांनी दिली. शाळा सुधारणेविषयी जिल्हा परिषद व रयत शिक्षण संस्था यांच्यामध्ये “सामंजस्य करार’ करण्याबाबत संजीवराजे नाईक निंबाळकर,डॉ. अनिल पाटील, उदय कबुले, संजय भागवत,प्रभावती कोळेकर, राजेश क्षीरसागर यांनी मार्गदर्शन केले. प्रतापसिंह हायस्कूलचे मुख्याध्यापक सन्मति देशमाने यांनी सूत्रसंचालन केले.
गुरुकुल प्रकल्पासह बरेच काही…
रयत शिक्षण संस्थेच्यावतीने प्रतापसिंह हायस्कूलमध्ये गुरुकुल प्रकल्प, डिजीटल स्कूल, गणित- विज्ञान व भाषा प्रयोगशाळा, शेती शाळा, शिक्षकांना अद्ययावत करण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण, सयाजीराव हायस्कूल व कल्याणी हायस्कूल या ठिकाणी जे उपक्रम राबविले जातात, ते सर्व उपक्रम प्रतापसिंह हायस्कूलमध्ये राबवण्यात येणार आहेत. येत्या पाच वर्षात प्रतापसिंह हायस्कूल शहरातील अग्रमानांकित शाळा म्हणून नावारुपाला येण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे डॉ. अनिल पाटील यांनी यावेळी सांगितले.