* अन्यथा आयुक्तांच्या कार्यालयात कचरा टाकू
* राष्ट्रवादीचे विशाल वाकडकर यांचा इशारा
* शहरवासियांचे आरोग्य धोक्यात आल्याचा आरोप
पिंपरी (प्रतिनिधी) – देहुरोड-कात्रज बाह्यवळण महामार्गावर रावेत उड्डाणपुलाखाली नदीपात्रात मागील अनेक दिवसांपासून कचरा टाकण्यात येत आहे. तो कचरा पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या आरोग्य विभागाने ताबडतोब उचलावा व कचरा टाकणाऱ्या संबधित ठेकेदारांवर, जबाबदार असणाऱ्या व्यक्तींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अन्यथा पुढील दोन दिवसांत तो कचरा आयुक्तांच्या कार्यालयात आणून टाकला जाईल, असा इशारा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना दिलेल्या पत्रात दिला आहे.
रावेत जलउपसा केंद्राच्या शेजारी हा कचरा टाकण्यात येत आहे. त्यातून दुर्गंधीयुक्त अस्वच्छ पाणी नदीतील पाण्यात मिसळत आहे. तेच दुषित पाणी रावेत जलउपसा केंद्रातून शहरातील 25 लाखांहून अधिक लोकसंख्येला पाणी पुरवठा करण्यासाठी उचलले जाते. या पाण्यात कचऱ्यातील हानीकारक जंतू आणि त्यामुळे उद्भवणारे आजार पाणी पुरवठ्यातून शहरातील नागरिकांच्या घरापर्यंत पोहचविण्याचे काम पालिकेचा आरोग्य व पाणी पुरवठा विभाग संगणमताने करीत आहे. आयुक्तांचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे शहरातील नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. शहरातील करदात्या नागरिकांच्या पैशातून महापालिका प्रशासन स्वच्छ भारत अभियानाची जाहिरातबाजी करण्यात मश्गूल आहे.
स्थानिक पातळीपासून केंद्रापर्यंत भाजपाचेच सरकार असताना पंतप्रधानांच्या स्वच्छ भारत अभियानास पालिका प्रशासन केराची टोपली दाखवित आहे. प्रशासनाच्या आशिर्वादाने कचरा उचलणारे ठेकेदार येथे हजारो टन कचरा टाकून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणत आहेत. मागील अनेक दिवसांपासून टाकलेल्या या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधीचा व मच्छरांचा त्रास निर्माण झाला आहे. दिवसाढवळ्या रोज कचऱ्याचे डंपर या ठिकाणी खाली होत आहेत. याकडे अजूनही संबंधित अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही? या बाबतही येथील नागरिकांमध्ये संताप आहे. ताबडतोब हा कचरा उचलला जावा, अशी मागणी येथील नागरिकांची आहे. अन्यथा पुढील दोन दिवसांनंतर उद्भवणाऱ्या परिस्थितीस आयुक्त श्रावण हर्डीकर हे जबाबदार असतील असेही राष्ट्रवादी शहर युवक अध्यक्ष विशाल वाकडकर यांनी पत्रात म्हटले आहे.