मुंबई – अगोदरच महागाई वाढली असताना युरोपात युध्द सुरू झाल्यामुळे वस्तूच्या आयातीचा खर्च वाढणार आहे. कच्च्या मालाच्या किमती वाढल्यामुळे कंपन्यांना आपल्या उत्पादनाच्या किमती काही प्रमाणात तरी वाढवाव्या लागणार आहेत. अशा परिस्थितीमध्ये कंपन्यांची नफा कमी होण्याची शक्यता वाढली असल्याचे विविध उद्योगांनी म्हटले आहे.
पार्ले प्रॉडक्ट या कंपनीचे वरिष्ठ अधिकारी कृष्णाराव बुद्धा यांनी सांगितले की, आम्ही वनस्पती तेलासह आमच्या उत्पादनासाठी काही वस्तू आयात करीत असतो. जागतिक वाहतुक खर्च वाढणार असल्यामुळे या सर्व वस्तू आम्हाला महागात मिळणार आहेत. त्याचबरोबर स्थानिक पातळीवर इंधन महाग होणार असल्यामुळे त्यामध्ये आणखी भर पडणार आहे.
अशा अवस्थेत आम्हाला उत्पादनाच्या किमती वाढवाव्या लागतील. उत्पादनाच्या किमती वाढविल्यानंतर विक्री कमी होऊन आमच्या नफ्यावर परिणाम होऊ शकतो. उषा इंटरनॅशनल या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनेश छाबडा यांनी सांगितले की, जर युरोपातील युद्ध दीर्घकाळ चालले तर त्याचा जागतिक अर्थव्यवस्थे बरोबरच भारतीय अर्थव्यवस्थेवर नकारात्मक परिणाम होणे साहजिक आहे.
युक्रेनमधून भारत तांब्याची मोठ्या प्रमाणात करतो. मात्र युक्रेन अस्ताव्यस्त झाल्यामुळे तांब्यासह विविध धातूच्या आयातीसाठी इतर देशाकडे वळावे लागणार आहे. मागणी वाढल्यामुळे या धातूंची किंमत वाढू शकते अशा अवस्थेमध्ये आमच्या विविध उत्पादनाच्या किमती वाढवाव्या लागतील. युद्धामुळे जागतिक नागरी विमान वाहतूकीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विमान आणि पर्यटन कंपन्यांनी या घडामोडीवर चिंता व्यक्त केली आहे.