नवी दिल्ली – दहशतवादाचा प्रसार करणाऱ्यांना आता कोठेही मदत मिळणार नाही. त्यामुळे पाकिस्तानने आता सत्य स्विकारुन इतर देशांच्या अंतर्गत गोष्टीत नाक खुपसण बंद करावं असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे.
दहशतवादाचा प्रसार करण्यास आता मदत मिळणार नाही म्हणूनच पाकिस्तान घाबरला आहे असे रवीश कुमार यांनी म्हटले आहे. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्राकडे नेण्याची धमकी पाकिस्तानने दिली असून त्यावर बोलताना रवीश कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानव्याप्त काश्मीरदेखील आमचाच आहे. आमच्या अंतर्गत गोष्टी संयुक्त राष्ट्राकडे नेण्याचा पाकिस्तानला कोणताच अधिकार नाही.
पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, पाकिस्तानला भीतीचे वातावरण निर्माण करायचे आहे. जम्मू आणि काश्मीरचा विकास झाला तर तेथील लोकांची दिशाभूल करु शकणार नाही यामुळे पाकिस्तान चिडलेला आहे. यावेळी समझोता एक्स्प्रेस आणि थार एक्स्प्रेससंबंधी बोलताना रवीश कुमार यांनी सांगितले की, पाकिस्तानने घेतलेला निर्णय एकतर्फी आहे. आमच्याशी कोणतीही चर्चा न करता हा निर्णय घेण्यात आला आहे. निर्णयावर पुनर्विचार करावा असं आम्ही त्यांना सांगितल आहे.