-अमित डोंगरे
सौराष्ट्रमधून एक क्रिकेटपटू भारतीय संघात निवडला गेला. रवींद्र जडेजा हे या खेळाडूचे नाव. सुरूवातीला चाचपडत असलेल्या जडेजाने लवकरच स्पीड पकडला आणि आपल्या अष्टपैलुत्वाचे दाखले कित्येक सामन्यात सातत्याने दिले. आता ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतही त्याने आपली गुणवत्ता सिद्ध केली आहे. मात्र, तरीही त्याला “द मोस्ट अंडररेटेड प्लेअर ऑफ इंडियन टीम’ असेच संबोधले जाते. उगीच इंग्रजीचे अंधानुकरण करण्यापेक्षा आपण जडेजाला शापीत गंधर्व म्हणूया.
50 कसोटी सामने, दीडशेपेक्षाही जास्त एकदिवसीय सामने व 50 टी-20 सामने भारतीय संघाकडून खेळल्यानंतरही जडेजाला म्हणावे तेवढे महत्त्व दिले जात नसल्याने जरा चिंता वाटते. संजय मांजरेकर यांच्याकडून त्याचा उल्लेख कामचलाऊ क्रिकेटपटू असा जरी होत असला तरीही खुद्द मांजरेकरांपेक्षाही जास्त सामने खेळलेल्या जडेजाची गुणवत्ता अगदी सुरूवातीला महेंद्रसिंग धोनीने ओळखली व विराट कोहलीने देखील ती मान्य केली.
आता कोहली जरी या मालिकेत कर्णधार नसला तरीही अजिंक्य रहाणेची मदारही त्याच्यावरच आहे. अजित आगरकरनंतर संघातील स्थान वारंवार गमावून पुन्हा कामगिरी व गुणवत्ता सिद्ध करत संघात परतलेला हा या दशकातील एकमेव खेळाडू असेल. त्याच्याकडे राहुल द्रविडसारखे तंत्र नाही, युवराजसिंगसारखे ग्लॅमर नाही. पण तरीही तो आज भारतीय संघाचा प्रमुख खेळाडू बनला आहे. त्याच्या गुणवत्तेची साक्ष जवळपास प्रत्येक सामन्यात त्याच्या खेळातून पटते.
सिडनीत सुरु असलेल्या कसोटीत पहिल्या डावात त्याने स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षण करताना थेट चेंडूफेक करत स्टिव्ह स्मिथला ज्या पद्धतीने धावबाद केले ते पाहून खुद्द जॉन्टी ऱ्होड्सलाही त्याचा हेवा वाटला असेल. या खेळाडूला तुम्ही कोणतीही जबाबदारी द्या, तो शंभर टक्क्यांपेक्षाही जास्त सरस कामगिरी करत त्या अपेक्षा पूर्ण करतो. त्याची गोलंदाजी किंवा फलंदाजी संघाला लाभदायक असते. त्याचबरोबर त्याचे क्षेत्ररक्षणही काहीवेळा सामन्याचा निकालही भारताच्या बाजूने फिरवणारे असते. हेच त्याने शुक्रवारी सिडनीत सिद्ध केले. स्मिथने मारलेला फटका अडवून सीमा रेषेवरून त्याने चेंडूफेक करुन थेट यष्ट्या उडवल्या तेव्हा काही क्षण स्मिथचाही आपल्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही.
असे खेळाडू केवळ टी-20 आणि एकदिवसीय सामन्यांसाठीच असतात हे मांजरेकर यांचे विधान चुकीचे ठरवतात. स्वतः काही करायचे नाही आणि दुसरा खेळत असेल तर त्याला प्रोत्साहन देण्याऐवजी त्याच्यावर टीका करायची हे असले उद्योग करत असलेल्या मांजरेकरांप्रमाणेच अन्य काही समालोचकही जडेजाच्या क्षमतेवर पूर्वी शंका घ्यायचे. तेच आता त्याच्या खेळाच्या प्रेमात पडले आहेत. मांजरेकरांचा मात्र जडेजाशी घटस्फोट झालेला आहे. उलट ते एखाद्या दिवशी जडेजाबद्दल चांगले बोलले तर आपल्यालाच काय जडेजालाही आश्चर्य वाटेल.
जडेजाची आकडेवारी पाहिली तर त्याच्या बाबतचा आदर आणखी वाढतो. 50 कसोटीत जवळपास 2 हजार धावा आणि 200 पेक्षा जास्त बळी तसेच एकदिवसीय सामन्यांत 2400 पेक्षा जास्त धावा व 180 पेक्षा जास्त बळी आणि टी-20 मध्ये 39 बळी ही त्याची कामगिरीच त्याचा दर्जा सिद्ध करत आहे. मात्र, इतके होऊनही त्याच्याकडे संघाचा आधारस्तंभ म्हणून पाहिले जात नाही, याचे वाईट वाटते.
“कॅचेस वीन मॅचेस’ हे तत्व तो अक्षरशः जगतो.
ऍडलेड कसोटीत पराभूत झालेल्या भारतीय संघाने मेलबर्न कसोटीत विजय मिळवला. या सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकी खेळी केली असली तरीही जडेजाने अर्धशतक फटकावताना रहाणेसह केलेली भागीदारी निर्णायक ठरली. आताही सिडनी कसोटीत त्याने स्मिथला धावबाद करत भारताच्या मार्गातील मोठा अडसर दूर केलाच. पण या डावात एकूण 4 बळी घेत त्याने ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीचे कंबरडेच मोडले. तरीही त्याच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारे मांजरेकर यांच्यासारखे महाभाग उपहासच करताना दिसून येतात हीच शोकांतिका आहे.
भारतीय संघासाठी फलंदाजी, गोलंदाजी व क्षेत्ररक्षण या तीनही क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यानंतरही त्याचे पाहिजे तेवढे कौतुक कधीच झाले नाही. अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जे ग्लॅमर द ग्रेट कपील देव, महंमद कैफ, युवराज सिंग किंवा परदेशात जॉन्टी ऱ्होड्स, मायकल बेव्हन, ऍर्ण्डयु सायमंड्स यांच्या वाट्याला आले ते जडेजाच्या वाट्याला येताना दिसत नाही. जडेजा जर परदेशी संघात असता तरच त्याच्या वाट्याला स्टारडम आले असते. मात्र, आपलेच आजी-माजी खेळाडू त्याच्या खेळाचे मनापासून कौतुक करताना दिसत नाहीत.
सातत्यपूर्ण कामगिरी करुन संघाच्या जवळपास प्रत्येक विजयात मोलाचा वाटा घेणारा हा खेळाडू एका शापीत गंधर्वासारखाच उपेक्षित राहात आहे. सिडनी कसोटीत जडेजाने जीव ओतून कामगिरी केली. केवळ या कसोटीत नव्हे तर प्रत्येक सामन्यात आपले योगदान देण्यासाठी तो प्रचंड मेहनत करतो, तरीही तो उपेक्षित का राहतो हाच प्रश्न सतावत आहे.