बुलडाणा – शेतकरी पात्र असूनही रिलायन्स कृषी विमा कंपनीने पिकविमा न दिल्याने शेतकऱ्यांचे ठिय्या आंदोलन सुरु आहे. पिकविम्याच्या रकमेसाठी चिखली कृषी कार्यालयासमोर 5 दिवसांपासून शेतकरी कडाक्याच्या थंडीत ठिय्या आंदोलन करत आहेत. प्रशासनाने दखल न घेतल्याने आणि शेतकऱ्यांना पिकविमा नाकारल्याच्या निषेधार्थ स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी मुंडन करून विमा कंपनीचा निषेध केला. आता आमाचे केस कापले, आंदोलनावर तोडगा निघाला नाही तर रिलायन्स कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या डोक्याचे केस उपटून काढू, असा इशाराही तुपकर यांनी यावेळी दिला.
काबाड कष्ट करून शेतकरी अन्न तयार करतात. नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना पिकविमा मिळणे हा त्यांचा हक्क आहे. त्यांना पात्र असूनही पिकविमा न दिल्यास कृषी कार्यालय उद्धवस्त करण्यात येईल अशी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिली आहे. तसेच तुपकरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने परिसरात तणावाची परिस्थिती तयार झाली होती. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. त्यानंतर जिल्ह्याचे कृषी अधिकारी आणि वरिष्ठ अधिकारी आंदोलन स्थळी चर्चेसाठी दाखल झाले.