लंडन – भारत आणि इंग्लंड यांच्यातील तिसरा कसोटी सामना येत्या बुधवारपासून सुरू होत आहे. लिड्सच्या हेडिंग्ले मैदानावर होत असलेल्या या सामन्यासाठी भारतीय संघात रवींद्र जडेजा याच्या जागी रवीचंद्रन अश्विनची निवड होणार असल्याचे सांगितले जात आहे. हा एकमेव बदल संघात होणार असून चेतेश्वर पुजारा व अजिंक्य रहाणे यांना या सामन्याद्वारे आणखी संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भारताने दुसऱ्या कसोटी सामन्यात दणदणीत विजय मिळवला होता. त्यामुळे विजयानंतर शक्यतो संघात मोठे बदल केले जात नाहीत. मात्र तिसऱ्या कसोटीत एक मोठा बदल केला जाऊ शकतो. कारण आतापर्यंतच्या दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये रवींद्र जडेजाला फारसे यश मिळालेले नाही. जडेजाला एकही गडी बाद करता आला नाही. त्यामुळे त्याच्याजागी अश्विनला संधी दिली जाण्याची शक्यता आहे.
अश्विनला जेव्हा पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी वगळण्यात आले होते तेव्हा सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. कारण अश्विनला संघाबाहेर काढण्याचे कोणतेही सबळ कारण त्यावेळी दिसत नव्हते. पण पहिल्या दोन कसोटी सामन्यांमध्ये अश्विनला संधी देण्यात आली नाही. पण या दोन्ही सामन्यांत जडेजा अपयशी ठरत असल्याचे दिसल्यामुळे तिसऱ्या सामन्यात आता अश्विनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे.
अश्विन हा कोणत्याही खेळपट्टीवर बळी मिळवू शकतो आणि आतापर्यंत त्याने ते सिद्धही केले आहे. त्याचबरोबर अश्विन हा उपयुक्त फलंदाजीही करू शकतो. त्यामुळे त्याचा भारतीय संघाला चांगलाच फायदा होऊ शकतो. त्यामुळे तिसऱ्या कसोटी सामन्यात अश्विन भारतीय संघात स्थान मिळवू शकतो, असेही चित्र सध्या दिसत आहे.
आतापर्यंत दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये भारताचे चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे दोघेही अपयशी ठरत असले तरीही त्यांची गुणवत्ता व ज्येष्ठता पाहता त्यांना या सामन्याद्वारे आणखी एक संधी दिली जाणार आहे. विराट कोहली कर्णधार असल्यामुळे त्याला वगळण्याचा प्रश्न निर्माण होत नसल्याने या सामन्यात जर पुजारा व रहाणे यांनी सरस कामगिरी केली नाही तर त्यांना चौथ्या सामन्यातून वगळले जाणार आहे.