सिडनी – भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीविराट कोहलीचे केलेले कौतुक त्यांच्याच अंगलट आले आहे. कोहलीने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात तसेच भारतात पराभूत करण्याची किमया केली आहे. त्याच्यासारखा अन्य कर्णधार सध्यातरी माझ्या पाहण्यात आलेला नाही, असे शास्त्री म्हणाले होते. त्यावर सोशल मीडियावर अनेक क्रिकेट प्रेमींनी त्यांच्यावर टीका केली आहे.
कोहली मायदेशी परतलेला असताना बदली कर्णधार म्हणून अजिंक्य रहाणेने कुशल नेतृत्वाच्या जोरावर संघाला मेलबर्न कसोटी जिंकून देण्यात मोलाची भूमीका पार पाडली. मात्र, तुम्ही अजूनही कोहलीचेच गुणगान का करत आहात, असा प्रश्नचाहत्यांनी शास्त्री यांनाविचारला आहे.
शास्त्री यांनी गेल्या सात दशकात झालेल्या भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या कसोटी मालिकेवर आधारित एका पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ही वक्तव्ये केली. यावेळी शास्त्री यांनी कोहलीचे कौतुक केले. 71 वर्षानंतर मालिका जिंकल्याचे समाधान वेगळेच होते. कोहलीने ऑस्ट्रेलियाला घरात आणि त्यांच्याच देशात हरवले आहे. पुढचा बराच काळ अन्य कोणत्याही भारतीय कर्णधाराला अशी कामगिरी करता येणार नाही, असेही शास्त्री म्हणाले.
कोहलीच्या नेतृत्वात भारताने दोन वर्षांपूर्वी 71 वर्षानंतर पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली होती. या मालिकेत भारताने ऑस्ट्रेलियाचा 2-1 ने पराभव केला होता. शास्त्री त्यावेळीही संघाचे प्रशिक्षक होते. ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच मायभूमीत कसोटी मालिकेत पराभूतकरणारा भारतीय संघ आशियातील पहिलाच संघ ठरला होता.