मुंबई – भारतातच नव्हे तर जगभरात करोनाचा प्रसार वाढत गेल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणुन दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द करण्यात आली तेव्हाच पुढील काळात भारतात लॉकडाऊनही केले जाईल याची कल्पना आली होती, असा खुलासा भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक व माजी कसोटीपटू रवी शास्त्री यांनी केला आहे.
न्यूझीलंड दौऱ्यावरून भारतीय संघ मायदेशी परतल्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार होती. त्यातील पहिला धर्मशाला येथील सामना पावसामुळे रद्द झाला व त्यानंतर चीनसह जगभरात करोनाचा धोका वाढला. त्यावेळी भारतातही काही जणांना करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. हा धोका आणखी वाढणार असल्याचेही त्यावेळी वर्तविण्यात आल्याने येत्या काळात संपूर्ण देशात लॉकडाऊन केले जाईल असे स्पष्ट दिसत होते, असेही शास्त्री यांनी सांगितले.
मालिका रद्द झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा संघ कोलकाता येथून दुबईमार्गे दक्षिण आफ्रिकेला रवाना झाला. त्याचवेळी करोनाचा प्रभाव वाढल्याचे समोर आले. ही मालिका खेळण्यासाठी आम्ही जेव्हा धर्मशालात दाखल झालो तेव्हा रस्त्यांवर सामसुम होती, तेव्हाच याची प्रचिती आली होती. न्यूझीलंडमधून भारतीय संघ सिंगापूरमार्गे मायदेशात दाखल झाला हे खूप चांगले झाले अन्यथा आम्हाला तिथेच थांबण्याची वेळ आली असती, असेही शास्त्री यांनी व्यक्त केले.