नवी दिल्ली – आर्थिक मंदीच्या प्रश्नावर तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कमाईचे दिलेले उदहारण केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी मागे घेतले आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत आर्थिक मंदीचा मुद्दा खोडून काढण्यासाठी रवी शंकर प्रसाद यांनी तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांच्या कमाईचे उदहारण दिले. 2 ऑक्टोंबरला तीन चित्रपटांनी 120 कोटींची कमाई केली. ही आर्थिक मंदीची स्थिती नाही असे त्यांचे म्हणणे होते.
काल मी मुंबईमध्ये तीन चित्रपटांनी एका दिवसात 120 कोटींची कमाई केल्याचे विधान केले. तथ्यांच्या आधारावर ते योग्य विधान आहे. त्यावेळी मी मुंबईमध्ये होतो असे रवी शंकर प्रसाद यांनी म्हटले आहे. आर्थिक मंदीवर जेव्हा रवी शंकर प्रसाद यांना प्रश्न विचारला त्यावेळी त्यांनी हसून मंदीचा दावा फेटाळून लावला होता. अर्थव्यवस्था चांगल्या स्थितीत असून देशाने तीन चित्रपटांमधून 120 कोटी कमावले असे उत्तर त्यांनी दिले. माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये मी माहिती आणि प्रसारण मंत्री होतो.
रवी शंकर प्रसाद यांनी आज प्रसिद्धीपत्रक जारी करुन या विधानावर स्पष्टीकरण दिले आहे. आम्हाला चित्रपटसृष्टीचा खूप अभिमान आहे. लाखो लोकांना चित्रपट उद्योग रोजगार देतो. कराच्या रुपाने देखील चित्रपटसृष्टी योगदान देते. अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलल्याची मी माहिती दिली. नरेंद्र मोदी सरकारला सर्वसामान्य माणसाची काळजी आहे, असे या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रसारमाध्यमांबरोबर साधलेल्या संवादाचा संपूर्ण व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहे. माझ्या संभाषणातील एका भागाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. मी संवेदनशील व्यक्ती असल्याचे ते विधान मागे घेतो, असे रविशंकर प्रसाद यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.