मुंबई – खासदार आणि अभिनेते ‘रवी किशन’ यांनी काही दिवसांपूर्वी लोकसभेत इंडस्ट्रीतील ड्रग्स सेवनाचा मुद्दा उपस्थित केला होता आणि त्याविषयी चौकशीची मागणी करत निषेध नोंदविला. “ड्रग्सचं सेवन आणि ड्रग्सची तस्करी हा खूप गंभीर विषय असून, या कटात आपल्या शेजारील देशसुद्धा सामील आहेत. आणि ड्रग्सचा फटका चित्रपटसृष्टीलाही बसला आहे.” असं रवी किशन म्हणाले होते.
दरम्यान, त्यांच्या या व्यक्तव्यावरून बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यपने रवी किशन यांचा जोरदार समचार घेतला आहे. एका मुलाखतीमध्ये बोलताना अनुराग कश्यप म्हणाला कि, “मी रवी किशनला बर्याच काळापासून ओळखत आहे. माझ्या ‘मुक्काबाज’ या चित्रपटात रवीने काम केलं होतं. जय शिव शंकर, जय शिवशंभू असं म्हणत रवी आपल्या दिवसाची सुरवात करतो. त्याने एकेकाळी गांजाचे झुरके मारले आहेत… हे सर्वांना माहित आहे.” असं अनुरागने सांगितलंय.
दरम्यान, सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील ड्रग्सचाही मुद्दा समोर आला. ड्रग्स प्रकरणावरून इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांवर निशाणा साधला जात आहे. इंडस्ट्रीची प्रतिमा मलिन केली जात असल्याची भावना काही कलाकारांनी व्यक्त केली आहे.